महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्राला जशी सांस्कृतिक परंपरा आहे तसेच महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, ती केवळ महाराष्ट्रापुरती सीमित न राहता ती जगाला माहिती हवी यासाठी महाराष्ट्रीयन पदार्थांचे जागतिकीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शेफ विष्णू मनोहर यांनी केले.
गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे कालचे मंगळवार( दि.13)चे तेरावे पुष्प गुंफताना स्व. मूळचंदभाई गोठी स्मृती व्याख्यानात ‘असे घडले विश्वविक्रम आणि मराठी पदार्थांचे जागतिकीकरण’ या विषयावर विष्णू मनोहर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजेंद्र गोठींसह मान्यवर उपस्थित होते. विष्णू मनोहर पुढे म्हणाले की, आपल्याकडे महाराष्ट्रात वेगवेगळे पदार्थ आहेत. जसे की, नाशिकचा चिवडा वैशिष्ट्यपूर्ण आहे. विदर्भातील खाद्यसंस्कृती वेगळी आहे. पश्चिम महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती वेगळी आहे. अगदी वेगळे सांगायचे झाले तर झुणका भाकर आणि वडापाव हेसुद्धा वेगळी चव देतात. मात्र, हे पदार्थ केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित आहेत. जगभरातील लोकांना ती माहिती नाही. अमेरिकेचे जर आपण उदाहरण घेतलं तर भारतीय पदार्थांपैकी त्यांना फक्त छोले भटोरे, पनीर मसाला, वडा सांबार इत्यादी पदार्थच केवळ माहिती आहे. मात्र, कोकणातला उकडीचा मोदक त्यांना माहिती नाही. विदर्भातली मोहाची दारू माहिती, वडापाव माहिती नाही. हे सर्व पदार्थ जगभरामध्ये कोणालाच माहिती नाही, ही खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. मराठी पदार्थ कसे मागे पडत आहेत किंवा ते विकायला आपण धाडस करत नाही याचे उदाहरण देताना त्यांनी दिल्लीतील चांदणी चौकाचे उदाहरण दिले. तिथे इडली सांबार विकणारा एक परप्रांतीय भैया डोक्यावर इडली आणि सांबार घेऊन येतो आणि अर्ध्या तासात विकून मोकळा होतो. मात्र, त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध झुणका भाकर का दिसत नाही? किंवा विकायला पुढे का कोणी येत नाही? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. महाराष्ट्रामध्ये जेवढे चटण्यांचे प्रकार आहेत तेवढे जगभरात कुठेच नाहीत, असे सांगून त्यांनी भारतीय आहार हा सर्वश्रेष्ठ आणि सात्त्विक आहे, असे जगभरातून सांगितले जाते. असा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. विष्णू मनोहर यांनी भारतीय तसेच महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचा सहा हजारांच्या वर मराठी पदार्थ असणारा खाद्यसंस्कृती कोश तयार केला असल्याचे सांगितले तसेच त्यांनी आपले वेगवेगळ्या देशांमधील पदार्थांबाबतची माहिती दिली. प्रमुख मान्यवरांचे स्वागत तसेच परिचय अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केला. प्रारंभी स्व. मूळचंदभाई गोठी यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विष्णू मनोहर यांचा अविनाश गोठी यांनी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. राजेंद्र बाफना यांनी राजेंद्र गोठी यांचा सन्मान केला. व्याख्यानमालेनंतर युनिक स्टार ग्रुप प्रस्तुत राज कपूर यांच्या अर्थात सत्तरच्या दशकातील हिंदी गीतांचा कार्यक्रम झाला.

 

नाशिक वसंत व्याख्यानमाला

आजचे व्याख्यान
स्व. पंडितराव खैरे स्मृतिव्याख्यान
1) अभय भंडारी, व्याख्याते, विटा, जि. सांगली
विषय : शिवचरित्रातून आम्ही काय शिकलो?
2) अक्षर काव्यसमूह, नवी मुंबई प्रस्तुत : ‘उत्सव कवितांचा ध्यास मराठीचा’ हा कार्यक्रम सादर होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *