मेघा वाळुंज
सूर्य मकर राशीतून धनु राशीत प्रवेश करतो, या संक्रमण काळास मकरसंक्रांत असे म्हणतात. मकरसंक्रांत हा नवीन वर्षातला पहिला सण 14 जानेवारीला येतो. लीप वर्ष असल्यास 15 जानेवारीला येतो. या वर्षाची संक्रांत षट्तिला एकादशीला येत आहे, हा दुग्धशर्करा योग आहे. हा दिवस फार चांगला मानला जातो. षट्तिला एकादशीला तिळाचे फार महत्त्व असते. या दिवशी तीळभक्षण, तीळस्नान, तीळ हवनाने घरातील नकारात्मक गोष्टी नष्ट होतात. हा सण भारत देशात वेगवेगळ्या नावाने साजरा करतात. आपला भारत देश कृषिप्रधान देश आहे त्यामुळे शेतकरी राजाने मातीतून पिकविलेल्या उत्पादनाशी निगडित आहे. शेतकरी राजाला रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन चांगले झालेले असते त्यामुळे शेतकरी राजा आणि त्यांचे कुटुंब खूश असते. या दिवसांत पिकवलेले धान्य गहू, हरभरा, ऊस, गाजर ,तीळ असे वेगवेगळे पिकांचे उत्पादन झालेले असते. त्या पिकांची पूजा शेतकर्यांची अर्धांगिनी आणि इतर महिलाही करतात. वरील गोष्टी मातीच्या सुगडात घालून देवाला अर्पण करतात. पूजा करतात. देवाचे आभार मानून, थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेऊन तीळगूळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणून तीळगूळ वाटतात.
मकरसंक्रांत हा सण तीन दिवसांचा असतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. भोगीला या दिवसात पिकवलेल्या सर्व भाज्यांची मिक्स भाजी करतात, खिचडी करतात. दुसर्या दिवशी संक्रांत सण साजरा करतात, तिळगुळाची पोळी, तिळगुळाचे लाडू आणि वड्या तयार करतात, तीळगुळाला घट्ट पकडून ठेवतो आणि आपला स्नेह गोडवा वाढवतो. या दिवशी वयाने मोठे असलेले लहानांना तीळगूळ देतात, मित्रमंडळी, लहान मुले आपल्या मनातील कटुता विसरून एकमेकांना तीळगूळ वाटतात. आपल्या मनातील आनंद द्विगुणित करणारा हा सण मुले पतंग उडवण्याचा आनंद घेतात. किंक्रांत या दिवशी 1 ते 5 वयापर्यंतच्या मुलांचे बोरन्हाण घालतात. महिला हळदी-कुंकू करतात. महिलांचे हळदी-कुंकू म्हणजे कार्यक्रमाची एक रम्य पहाटच. महिलांनी गजबजलेली एक वादळीवाट! या हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मन संवादातून, महिलांना सकारात्मक ऊर्जा मिळते, एकमेकीच्या भेटीने त्यांच्या मनातील विचार, संवाद एक-दुसरीपर्यंत पोहोचवला जातो. त्या व्यक्त होतात. आजच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनात भरडलेली महिला यानिमित्ताने एकमेकींना भेटते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, नवचैतन्य प्राप्त होते, स्वतःच्या मनाला ओळखले जाते. त्यांना त्यांचं अस्तित्व समजतं, स्नेहभाव वाढतो, एकत्रीकरणातून सशक्तीकरणाचा संदेश मिळतो. महिला सकारात्मक आनंदी होते.
कुंकू म्हणाले हळदीला तुझा मान खाली!
हळद म्हणाली कुंकवाला अरे माझ्यामुळे तर तुला शोभा आली!!
हळद म्हणाली कुंकवाला, ‘हळदी कुंकवाला या’ म्हणून आधीच माझं नाव घेतात, वर तू असला तरी अगोदर मलाच मान देतात! असे हे हळदी-कुंकू संक्रांतीनिमित्त महिला रथसप्तमीपर्यंत करतात. हळदी-कुंकू असले की महिलांची धावपळ सुरू होते. वाण काय देऊ, घर किती सजवू, तिळाच्या वड्या करू की लाडू याप्रकारे महिलांचा किलबिलाट म्हणजेच वाहणारी एक खळखळती सरिता! एकमेकींच्या भेटण्यामुळे होणारे संवाद, उखाणे हे आपल्या सोनेरी क्षणांची एक आठवण ठेवतात!
अतुट शब्दांच्या पलीकडचे एक मैत्रीचे सुंदर फुललेले नाते, गप्पागोष्टी, हसणं, नटणं मुरडणं याच्यापलीकडचे जगावेगळे नाते, महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण करून जाते आणि पुन्हा त्या नव्या जोमाने कामाला सुरुवात करतात.
Makar Sankranti