मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मनोज जरांगे पाटील यांची पांगरी येथील सभेत ग्वाही
सिन्नर: प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी शासनाला ४० दिवसांची दिलेली मुदत २४ तारखेला संपत आहे. आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी एकजुट फुटू देऊ नका. मी, खानदानी शेतकऱ्याचा पोरगा आहे मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही. सगळे मंत्रीमंडळ एकवटलं तरी मी माझी भुमिका विचलीत होऊ दिली नाही. जीव गेला तरी बेहत्तर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शासनाने कितीही डाव टाकू द्या ते उधळूनच लावू असा इशारा मराठा आरक्षणाचे लढवैय्ये मनोज जरांगेपाटील यांनी दिला.
पांगरी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. १४ तारखेला आंतरवली सराटी येथे सरकारची मुदत संपण्यापुर्वी समाजाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला असून त्यासाठी राज्यभरातील मराठा बांधवांनी कामधाम बाजूला ठेऊन उपस्थित रहावे असे आवाहन करतानाच आरक्षणासाठी उग्र स्वरुपात आंदोलन करु नये, जाळपोळ करु नका, गुन्हे दाखल झाल्यास मराठा तरुणांच्या भविष्यात शिक्षणात तसेच नोकरीत अडचणी निर्माण होतील. समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, आरक्षणासाठी समाजातील तरुण मरायला लागले तर आरक्षण घेऊन करायचे काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कुठलाही डाग समाजावर लागू देऊ नका असा सल्ला त्यांनी दिला.
राज्यभरातील संपूर्ण मराठ्यांना कुणबी जातीचे दाखले तलाठी स्तरावर सरसकट मिळाले पाहिजे अशी मागणी यावेळी छावाचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी केली. छावाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी मरा- ठा आरक्षण मिळण्यासाठीचे बारकावे सांगितले. यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, विठ्ठल उगले, प्रा. राजाराम मुंगसे, राजाराम मुरकुटे, अॅड. संजय सोनवणे, अॅड. राजेंद्र चव्हाणके, शशि- कांत गाडे, कृष्णा घुमरे, मयुर पांगारकर, जगदीश पांगारकर, विठ्ठल जपे, करण गायकर, दत्ता वायचळे, ज्ञानेश्वर पांगारकर, शरद शिंदे, विजय गडाख, हरीभाऊ तांबे, कैलास निरगुडे, नारायण वाजे, सविता कोठुरकर, रामदास खैरनार, सारिका पांगारकर, सुभाष कुंभार, भाऊसाहेब शिंदे आदींसह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओबीसी आरक्षण देण्यासाठी विविध जाती मागास असल्याचे सिध्द होणे अपेक्षीत असताना अनेक उपजातींचा ओबीसीत समावेश करुन शासनाने मराठा समाजाची खिल्ली उडवली आहे. ओबीसीचे आरक्षण २८ टक्क्याहून ३० टक्क्यांवर पोहचले मात्र त्यास कुठलाही आधार नाही. देशातील एकमेव मराठा जात अशी आहे, ती मागास असल्याचे सिध्द झाले असून मराठा कुणबी असल्याचे ५ हजार पुरावे सापडले आहे. या समाजाचा ओबीसीत समावेश झाला नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. उपोषण मोडीत काढण्यासाठी मंत्रीमंडळातील शासनाने नेमलेल्या व्यक्तींनी ते मोडीत काढण्यासाठी टाकलेले डाव आणि त्यावर केलेली मात याचा पाढा त्यांनी यावेळी
वाचला.
पांगरी येथे सुरु असलेल्या जनावरांच्या चारा-पाण्यासाठीच्या आंदोलनात पालकमंत्र्यांनी लक्ष दिले नाही तरी आपण स्वतः यासंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि सिन्नर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चारा-पाण्याची व्यवस्था करण्यास शासनास भाग पाडू. शासनाने दुर्लक्ष केल्यास आपण स्वतः पांगरी येथे उपोषणास बसू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.