खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती
नाशिक : प्रतिनिधी
सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. ही मराठी माणसाची आणि ठाकरे ब्रँडच्या एकजुटीची ताकद आहे. या ताकदीसमोरच सरकारला झुकावे लागले, असे प्रतिपादन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या नाशिक कार्यालयात हिंदीसक्ती रद्द झाल्यानंतर 5 जुलैला होत असलेल्या सर्वपक्षीय विजयी मेळाव्यासंदर्भात नियोजन बैठक पार पडली. याप्रसंगी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांसह मनसेचा सहभागही लक्षणीय ठरला. खासदार वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, माकपा पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी सर्वपक्षीय एकजुटीबद्दल आनंद व्यक्त करतानाच ही एकजूट असली की काय होऊ शकते, याची आता फक्त झलक दिसली आहे. आगामी काळात अशीच एकजूट आपली असली तर कोणीच आपल्याला रोखू शकत नाही. येणार्या काळात सरकारचे असे काही निर्णय असो की मग निवडणुका असोत, आपल्याला कोणीच रोखू शकत नाही, असे सांगितले.
यावेळी शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष गजानन शेलार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, माकपचे तानाजी जायभावे, मनसे महिला उपाध्यक्ष सुजाता डेरे, काँग्रेस शहराध्यक्ष स्वाती भामरे, संजय चव्हाण, महेंद्र बडवे, राहुल दराडे, किशोर दलोड, सचिन बांडे, बबलू खैरे, अस्लम मणियार, मसूद जिलानी, दिलीप मोरे आदींसह मोठ्या संख्येने सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सिंहस्थ कुंभमेळा प्रायव्हेट लिमिटेड
सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की, अवघ्या वर्षभरावर आलेला कुंभमेळा म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड होताना दिसत आहे. विरोधी पक्ष सोडा, स्वपक्षाच्या आमदारांनाही विश्वासात घेतले जात नाही. कुंभमेळा हा कोणाचा खासगी नसून नाशिककरांचा आहे. नाशिककर त्याचे आदरातिथ्य करतील. त्यामुळे आता आहे अशीच एकजूट ठेवून लढलो तर आपल्याला सिंहस्थ कुंभमेळा नाशिककरांचा करता येईल.
5 जुलैला एकजूट दाखविण्याचे आवाहन
आपली फक्त एकजूट होते आहे हे दिसले, तरी सरकारने हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतला आहे. या आपल्या एकजुटीचा आनंद साजरा करण्यासाठी 5 जुलै रोजी मेळावा होत आहे, असे बिलकुल मनात न ठेवता आता निर्णय झाला आहे, आता सरकारने माघार घेतली आहे, मी गेलो काय किंवा नाही गेलो काय, असा कुठलाही विचार डोक्यात न ठेवता सर्वांनी मोठ्या ताकदीने 5 जुलैला मुंबईत जमून मराठी माणसाची एकजूट, महाराष्ट्राची एकजूट काय असते ते दाखवून द्यायचे आहे, असे खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले.