इगतपुरीत शेतकरी, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन
इगतपुरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील शेतकरी व कामगारांच्या विविध समस्या कायम असून, गेली 10 वर्षांत सत्तेत असलेले भाजप-युती सरकारने नागरिकांच्या समस्या सोडविण्याऐवजी त्यात मोठ्या प्रमाणात वाढ निर्माण केली असून, सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.
अनेकदा निवेदने, आंदोलन करूनही सरकार प्रलंबित प्रश्न सोडविण्यास असमर्थ ठरत असल्याच्या निषेधार्थ सीटूच्या वतीने जिल्हा सचिव देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वात इगतपुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक व शेतकरी, कामगार मोठ्या प्रमाणात विविध कामांसाठी शासकीय कार्यालयांत चकरा मारतात, मात्र एकही काम होत नाही. त्यात नागरिकांचा वेळ व आर्थिक नुकसान होते, मनस्ताप होतो. शासकीय कर्मचारी दलालांमार्फत आर्थिक देवाणघेवाण करून नागरिकांची लूट केली जाते. यात शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. यांसह विविध मागण्यांबाबत निदर्शने करीत आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार धनंजय लचके यांना निवेदन देण्यात
आले. याप्रसंगी सीटूचे जिल्हा नेते सीताराम ठोंबरे, जिल्हा सचिव देवीदास आडोळे, आप्पासाहेब भोले, सुनील मालुंजकर, दत्ता राक्षे, चंद्रकांत लाखे, रामदास चारोस्कर, सुरेश कोरडे, रुंजा वाघ, शिवराम बांबळे, किशोर कडू, विशाल घोटे, चेंडू भरीत, त्र्यंबक खाडे, निवृत्ती कडू, बबाबाई लहांगे, जयाबाई घाटाळ, संध्या जोशी, शकुंतला तळपाडे, विश्वास दुभाषे, मच्छिंद्र गतीर, संदीप कातोरे, गोकुळ गोवर्धने, राहुल गायखे, हिरामण भोर, अशोक राव, अशोक कदम, तुकाराम मते, काळू मुकणे, भगवान वाघ, भाऊसाहेब जाधव, विठ्ठल बर्वे, ज्ञानेश्वर गतीर, तुकाराम भगत, संतोष कुलकर्णी आदींसह तालुक्यातील शेतकरी, कामगार मोर्चात सहभागी झाले होते.
मोर्चातील मागण्या
जनसुरक्षा विधेयक रद्द करा. कामगार व शेतकरीविरोधी चार श्रम संहिता कायदा मागे घ्या. तालुक्यातील कातकरी व आदिवासी समाजासाठी मंजूर घरकुलांना वनविभाग गायचरणातून जागा देऊन घरकुले बांधून मिळावी. मुंडेगाव येथील रेल्वेपुलाखाली बंद रस्ता काम पूर्ण करा. 14 प्रलंबित विषयांबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.