दिंडोरी तालुक्यात मेंढ्यांचे कळप
दिंडोरी ः प्रमोद ठेपणे
तालुक्यात चारा-पाण्याच्या शोधात शेकडो मेंढ्यांसह मेंढपाळ बिर्हाडासह गावोगावी फिरताना दिसत आहेत. पशुधनाच्या चार्यासोबत पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करताना मोठी कसरत होताना दिसुन येत आहे.
दिंडोरी धरणांचा तालुका म्हणून ओळख आहे. सद्यस्थितीत पाण्याअभावी शेतकरी वर्गासोबत गावागावात पाणीटंचाई निर्माण होत आहे. विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. मेंढपाळ आपल्या पशुधनाच्या चार्या व पाण्यासाठी आपले शेकडो पशुधन घेवुन फेब्रुवारीपासुन मे-जून महिन्यापर्यंत जिकडेतिकडे पाण्याच्या शोधार्थ वास्तव्यास येत आहे. शेतकर्यांच्या शेतातील काढणीस आलेले पीक त्याते टोमॅटो, वाल पीक चारण्यासाठी मेंढपाळ त्या पिकासाठी उभे केलेले तार, बांबूचे फाउंंडेशन जमा करून देत असतात. त्या मोबदल्यात मेंढपाळ पशुधन त्या ठिकाणी दोन ते सहा दिवस मुक्काम ठोकत असतात, अशाच दिनक्रमानुसार दिवसामागे दिवस करीत काही दिवस काढीत असतात. मात्र जसजसा मार्च महिना सुरू होतो, तसतसे त्यांचे बिर्हाड दिवसागणिक बदलणे भाग पडते. या काळात मोठ्या प्रमाणावर आलेले मेंढपाळ हे पशुधनासाठी पाण्याच्या शोधात असतात आणि पर्यायानेच बरेच मेंढपाळ हे एकाच परिसरात थोड्याफार अंतरावर ठियया मांडतात.
त्याचा विपरीत परिणाम हा चार्यावर होऊ लागतो, त्यांना शेकडो पशुधनाच्या चार्यासाठी वाढत्या तापमानाची पर्वा न करता मैलोमैल भटकंती करावी लागत आहे. पुन्हा पाण्यासाठी तेवढीच पायपीट करुन मेंढपाळांना पाण्याच्या ठिकाणावर यावे लागते. एवढे सर्व कष्ट सहन करुनही मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी आम्हाला जागे राहावे लागते, त्यात हिंसक जनावराची भीती असे एका मेंढपाळाने बोलताना सांगितले.
वन्यप्राण्यांचा पशुधनाला फटका
सध्याच्या परिस्थितीमध्ये जंगलात पाणी (पाणवठे) नसल्यामुळे हिंस्र प्राणीही रात्रीच्या वेळी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे फिरकत असतात. त्याचा फटका आमच्या पशुधनाला बसण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कितीही लाखो रुपयांची आमची संपत्ती असली तरी आमचे जीवन मात्र उघड्यावर आणि असह्य वेदनांनी भरलेलेच असते, असेही मेंढपाळांनी सांगितले आहे.