हवामान विभागाचा पुढील 2 दिवस यलो अलर्ट

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेला पाऊस पुढील दोन दिवस पुन्हा बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट दिल्याने उद्या गुरुवार (दि.5) आणि शुक्रवार (दि.6) रोजी वादळी वार्‍यासह पाऊस येण्याची दाट शक्यता आहे.
मागील महिन्यात अवकाळीने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला. संपूर्ण राज्यात जवळपास तेवीस हजार हेक्टर तर जिल्ह्यात सहा हजार हेक्टरवरील पीकपाणी उद्ध्वस्त झाले. यामुळे आता कर्जफेडीसह इतर जबाबदा़र्‍या कशा पार पडणार, याची चिंता बळीराजाला लागुन राहिली आहे. जिल्ह्यातील भाजीपाला, फळपिके, गहू, हरभरा, कांदा आदी पिके उद्ध्वस्त झाल्याने महागाईतही भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कृषिमंत्र्यांनी त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पीकहानी आणि पशुहानी मोठ्या प्रमाणावर झाली. पुढील दोन दिवस वादळी वार्‍यांंसह विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट बघावयास मिळू शकतो. गत महिनाभरातील वादळीवार्‍यांंसह बरसलेल्या पावसाने अगोदरच पीकपाण्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यातच आता पुन्हा अवकाळी बसरणार असल्याने शेतक़र्‍यांंची पाचावर धारणाच बसणार आहे.

जिल्ह्यातील अवकाळीचे पंचनामे अंतिम टप्प्यात

गत महिन्याभरात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्वच तहसिलदारांना याबाबत अहवाल त्वरीत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील दोन दिवसात अहवाल प्राप्त होण्याची चिन्हे असून यानंतर अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात साडेसहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जिल्हयात सुमारे साडेसहा हजार हेक्टरवरील पीकपाण्याचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषिमंत्र्यांनी आढावा बैठकीत वर्तविला त्यानंतर त्वरीत पंचनामे सुरु करण्यात आले. यामध्ये भाजीपाला, गहु, बाजरी आदी बागायती पिके, तर हरबरा, मका या लागवड केलेल्या पिकांचेही अतोनात नुकसान झाले. पंचनाम्यानंतर लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *