तरुणांचे रोजगारासाठी स्थलांतर पाचवीला पूजलेले

सुरगाण्यासह ग्रामीण भागातील चित्र; उपाययोजना होणे गरजेचे

दिंडोरी : प्रमोद ठेपणे
ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न अजूनही जैसे थे आहे. सुरगाणा तालुक्यातील बहुतेक भाग हा डोंगराळ व दुष्काळसदृश असल्यानेे रोजगाराचे स्त्रोत उपलब्ध नाहीत. त्यामुळे पावसाळा सोडल्यास उर्वरित आठ महिने रोजगारासाठी येथील तरुणांना रोजगारासाठी स्थलांतर करावेच लागते. उपजीविकेसाठी स्थलांतर हे जणू त्यांच्या पाचवीलाच पूजलेले आहे.
सुरगाणा तालुक्यातील शेतमजूर शेतीविषयक कामांना प्राधान्य देतात. अन्य तालुक्यांसह जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार दरवर्षी जीपगाडी किंवा पिकअप घेऊन मजूर घ्यायला येतात. शेतमजूरही धान्य, तांदूळ, पीठ, लाल चटणी, डाळ, अंगावरील कपडे आदींसह चार महिन्यांची शिदोरी घेऊन रोजगारासाठी स्थलांतर करतात. कर्नाटक, पंढरपूर, सांगली, सातारा, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, वणी, सोनजांब, चिंचखेड, पाचोरा, शिंदवड, चामदरी, परमोरी, दह्याणे, कोशिंबे, पालखेड, ओझरखेड, अंबानेर, बाडी, जोपूळ, भातोडे, दुधखेड, ओझे आदी ठिकाणी द्राक्षबागेच्या कामाला जातात. त्यात छाटणी, पेस्ट चोळणे, फेल काढणे, डिपिंग, बगला काढणे, द्राक्ष खुडणे आदी कामे करतात. शेतातच बांधवावर संसार मांडून तीन विटांची चूल तयार करून स्वयंपाक बनवतात. शेतमालकाच्या शेतातील भाजीपाला हक्काने मागून घेतात. काम पूर्ण झाल्यानंतर कधीतरी मालकाकडून पार्टीचाही आग्रह करतात. मालकही स्वखुशीने बॉयलर चिकन आदींची पार्टीही देतो. काही मालक घरात बनवलेले पदार्थ शेंगदाण्याचा कूट टाकून बनवलेले पातळ कालवण, भाजी, पोळी आवडीने देतात. भोळे भाबडे आदिवासी बांधव आवडीने खातात. केवळ पुरुष मजूर असल्यास रामप्रहरी उठून पाळीनुसार स्वयंपाक करतात. एकजण डाळ घसटतो, तर काही जण भाजी चिरतात, भात बनवतात. गव्हाच्या पोळ्या बनवतात, तर एकजण पोळ्या शेकतो तर एकाला भांडी घासण्याचे काम सोपवलेले असते. कामाचा वाढता व्याप अन् वाढत्या उन्हाचा ताप यामुळे सकाळी लवकर उठून अंघोळ न करताच मजुरीसाठी एका गावाहून दुसर्‍या गावाला पायपीट करत जातात. सायंकाळीच काम आटोपून आल्यानंतर अंघोळ करतात. हिवाळा, उन्हाळ्यातील आठ महिने रोजगारासाठी घाटमाथ्यावर गेले नाही तर पावसाळ्यातील गरज भागविणे अवघड होते. आठ महिने कमविलेल्या पैशांतून पिकांना खते, लाल मिरची, छत्री, रेनकोट, चप्पल, शाळेतील मुलांची स्टेशनरी आदी गरजा भागवितात. सुरगाणा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतर हे ठरलेले आहे.
स्थानिक ठिकाणी रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. धरणे, नदीला छोटे-मोठे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, पाझर तलावांची व्यवस्था केल्यास उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध होईल. त्यातून शेतात विविध पिके घेता येतील व रोजगारही उपलब्ध होईल. परिणामी स्थलांतर थांबले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Migration of youth for employment celebrated in 5th grade

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *