नाशिक : प्रतिनिधी
भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पाश्वर्र्भूमीवर हल्ला झाल्यास कशी काळजी घ्यावी, याची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी पंचवटी नागरी संरक्षण दलातर्फे शुक्रवारी (दि. 9) रामकुंड परिसरात मॉकड्रिल झाले. शत्रूच्या विमानांकडून बॉम्बहल्ला झाल्यास नागरिकांनी काय दक्षता घ्यावी, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. नागरी संरक्षण दल, गृहरक्षक दल, महापालिका अग्निशमन दलातर्फे आखण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेदरम्यान मॉकड्रिल घेण्यात आले.
मॉकड्रिलदरम्यान शत्रुराष्ट्राची लढाऊ विमाने येत असल्याची खबर मिळताच सायरन वाजू लागला. रामकुंड परिसरात बॉम्ब पडताच नागरिकांची एकच धावपळ उडाली. सुरक्षेसाठी पालथे झोपून नागरिकांनी आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. शत्रुराष्ट्राकडून रामकुंड परिसरात बॉम्बहल्ला झाल्याची खबर मिळताच नागरी संरक्षण दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल तीन मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. बॉम्बहल्ल्यातील जखमींना त्वरित फर्स्टएड पोर्टपर्यंत पोहोचविण्यात आले. तेथून रुग्णवाहिकेने त्यांना रुग्णालयात नेले. यावेळी ठिकठिकाणी लागलेल्या आगी अग्निशमन दलाने पाण्याचे फवारे
मारून विझवल्या.
भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने केंद्र शासनाच्या
निर्देशानुसार संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मॉकड्रिल घेण्यात आले. भद्रकाली, देवळाली, सातपूर, अंबड, ओझर, नाशिकरोड, सरकारवाडा आदी ठिकाणी मॉकड्रिल झाले.
मॉकड्रिल पाहण्यासाठी गर्दी
नाशिक शहर धार्मिक पर्यटनस्थळ असल्याने येथे कायम पर्यटकांची गर्दी असते. उन्हाळा असल्याने पर्यटकांची गर्दी अधिक वाढली आहे. रामकुंडावर प्रशासनाकडून मॉकड्रिल होत आहे, हे माहीत नसल्याने काही पर्यटक घाबरले होते. मात्र, नंतर जेव्हा लक्षात आले की, मॉकड्रिल करण्यात येत आहे. यावेळी पर्यटकांनी मॉकड्रिल पाहण्यासाठी गर्दी केली होती.