पहिल्या फेरीच्या अंतिम यादीपूर्वी प्रक्रियेतील प्रत्येक तक्रार दूर करणार
मुंबई : प्रतिनिधी
इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी येणार्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असून, नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या
फेरीमधील नोंदणीमध्ये दि. 1 जून रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अखेर 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती सहसंचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली.
प्रवेशप्रक्रियेतील पहिली फेरी सुरू झाल्यानंतर संपूर्ण राज्यातून विद्यार्थी नोंदणी करत असून, संकेतस्थळावर ताण येत असल्याने थोड्या प्रमाणात संकेतस्थळ संथ गतीने चालणे, तसेच प्रवेश शुल्क भरण्यामध्ये अडचणी, कॉलेज पसंतीक्रम भरण्यामध्ये अडथळे येणे अशा अडचणी निदर्शनास आल्या. या बाबींवर संबंधित कंपनीमार्फत तत्काळ उपाययोजना/ पर्यायी व्यवस्था करून प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेचा नोंदणी अर्ज भरण्याकरिता दि. 26 मे 2025 ते 3 जून 2025 पर्यंतचा एकूण नऊ दिवसांचा पुरेसा कालावधी देण्यात आला असून, या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार असल्यास अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक तक्रार दूर केली जाईल, असेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जात असून, कोणत्याही विद्यार्थ्याने काळजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावरील काही बदल, नवीन पर्याय समाविष्ट करणे आवश्यक असल्याने त्याबाबतचे काम सुरू होते. यादरम्यान क्षेत्रीय स्तरावरून आणि तज्ज्ञांकडून प्राप्त होणारे बदल यामुळे संकेतस्थळ तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागला. त्यामुळे प्रक्रियेच्या जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दि. 21 मे 2025 पासून प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी सुरू करणे शक्य झाले नाही. यानंतर संकेतस्थळाबाबत तांत्रिक अडचणी दूर करून दि. 26 मे 2025 पासून विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात आली. या बदलाबाबत संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे) यांनी प्रसिद्धिपत्रकाव्दारे स्पष्टीकरण देखील दिलेले आहे.
विद्यार्थ्यांना येणार्या अडचणींचे निवारण करण्यासाठी विभागस्तरावर तांत्रिक सल्लागार, मार्गदर्शन केंद्र, हेल्पलाइन नंबर, सपोर्ट डेस्क, संकेतस्थळावर मराठी आणि इंग्रजी भाषेमधील माहिती पुस्तिका, प्रश्न-उत्तरे, विद्यार्थी युजर मॅन्युअल, ‘करिअर पाथ’चा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये विद्यार्थ्यास काही बदल करावयाचा असल्यास ग्रीवन्सचा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. विद्यार्थी/ पालक यांच्यासाठी विभागस्तरावर/ जिल्हास्तरावर अधिकारी/ कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक संकेतस्थळावर देण्यात आले असल्याचेही विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
सन 2025-26 पासून संपूर्ण राज्यात प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने यामध्ये 9342 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 20 लाख 88 हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश क्षमता उपलब्ध झाली असल्याचेही शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात
आले आहे.