नायगावकरांचा रस्ते दुरुस्तीसाठी ‘रास्ता रोको’

दोन दिवसांत कामाचे लेखी आश्वासन; निकृष्ट कामाच्या तक्रारीवर आंदोलनाचा इशारा

सिन्नर : प्रतिनिधी
नायगावला जोडणार्‍या तीनही बाजूंच्या मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, गेल्या अनेक वर्षांपासून या नरकयातना सोसणार्‍या नायगावकरांचा संयम अखेर शुक्रवारी (दि.13) सुटला. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शेकडो ग्रामस्थांनी शिंदे-सिन्नर-सायखेडा
त्रिफुलीवर आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आणि साखळी उपोषण केले. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसांत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास गाठ आमच्याशी आहे, असा सज्जड दमही ग्रामस्थांनी यावेळी दिला.
नायगाव परिसरातून जाणार्‍या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ग्रामस्थांनी शिंदे-सिन्नर-सायखेडा त्रिफुलीवर ठिय्या मांडला. सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. प्रवाशांचेही मोठे हाल झाले.
या जनआंदोलनात धनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन संग्राम कातकाडे, गोदा युनियनचे लक्ष्मण सांगळे, माजी सरपंच भाऊसाहेब लोहकरे, विष्णू पाबळे, दिगंबर कातकाडे, हर्षल बैरागी, बाळासाहेब केदार, भाऊसाहेब सांगळे, विजय गायकवाड, नारायण साठे, एकनाथ सानप, संदीप पानसरे, विजय भगत, भारत जेजुरकर, बबलू शेख, दत्तात्रय तांबे, जहीर शेख, चंद्रभान पिंपळे, पुरुषोत्तम सौंदाणे, इंदुमती कातकाडे, मीनानाथ कातकाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुसळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

केवळ मलमपट्टी नको, तर ठोस काम हवे!

प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळावे. केवळ खड्डे बुजवण्याची मलमपट्टी न करता दर्जेदार काम करावे. जर कामाचा दर्जा निकृष्ट आढळला तर पुढचे आंदोलन रस्त्यावर नाही तर थेट बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या दारात छेडले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

प्रशासनाची नमती भूमिका

आंदोलनाची तीव्रता आणि ग्रामस्थांचा रोष पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अविनाश देवरे यांच्या सूचनेनुसार अक्षय मेतकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून, अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांचे काम येत्या 48 तासांत सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. हे लेखी पत्र मिळाल्यानंतरच ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.

Naigaon residents block roads for road repairs

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *