नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात

लासलगाव : समीर पठाण
नाशिकच्या द्राक्षशेतीने यंदाही आंतरराष्ट्रीय छाप कायम ठेवली आहे. द्राक्ष हंगामात अवकाळी पावसाचे संकट, रोगांचा प्रादुर्भाव आणि हवामानातील चढउतार असूनही जिल्ह्याने द्राक्ष निर्यातीचा भक्कम पल्ला गाठला आहे. या हंगामात जिल्ह्यातून तब्बल 1.57 लाख टन द्राक्षांची निर्यात झाली. ही आकडेवारी मागील वर्षाच्या तुलनेत स्थिर असून, यामध्ये युरोपियन देशांचा मोठा वाटा आहे.
निर्यातीच्या आकडेवारीनुसार, युरोपियन देशांना एकट्या नाशिक जिल्ह्यातून 1.10 लाख टन द्राक्षांची निर्यात झाली, तर बिगर युरोपियन देशांकडे सुमारे 47 हजार टन द्राक्षे पाठवण्यात आली. यात नेदरलँड्स, जर्मनी, इंग्लंड, बेल्जियम, रशिया, दुबई, बांगलादेश आणि मलेशिया यांचा समावेश होता.
नाशिकची द्राक्षे हे आता केवळ फळ नाही, तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ब्रँड बनू लागला आहे. हवामानातील बदल, जागतिक स्पर्धा तरीही जागतिक बाजारात टिकणारे ‘नाशिक ग्रेप्स’ म्हणजे ब्रँड ठरत आहे. या निर्यातीमुळे भारताच्या फळ निर्यातीत द्राक्षांनी आपले अग्रस्थान पुन्हा सिद्ध केले आहे. संपूर्ण देशातील द्राक्ष निर्यातीत जिल्ह्याचा हिस्सा सर्वाधिक आहे.
यंदा नाशिक जिल्ह्यातून 28 हजार 964 शेतकर्‍यांनी निर्यातयोग्य द्राक्षासाठी नोंदणी केली. जिल्ह्याचे एकूण द्राक्ष उत्पादन क्षेत्र 58 हजार 367 हेक्टर इतके आहे. या हंगामात द्राक्षांना मिळालेला दरही शेतकर्‍यांसाठी दिलासादायक ठरला. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान प्रतिकिलो 75 ते 110 रुपये दर मिळाला, जो मागील वर्षाच्या 55 ते 85 रुपयांच्या तुलनेत अधिक होता.
जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, चांदवड, बागलाण आणि कळवण तालुक्यांमध्ये द्राक्षशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. येथे उच्च दर्जाचे द्राक्ष उत्पादन होत असल्यामुळे निर्यातक्षम फळांचा पुरवठा सातत्याने शक्य होतो. याचाच परिणाम म्हणून द्राक्ष निर्यातीत वाढ
होत आहे.

नाशिक जिल्ह्याने द्राक्ष निर्यातीमध्ये सलग दुसर्‍या वर्षी स्थैर्य टिकवले आहे. हवामानातील अनिश्चितता, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा आणि वाहतूक अडथळे असूनही शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर ही कामगिरी साधली आहे. शासनाकडून लॉजिस्टिक सुविधा, थेट निर्यात साखळी आणि शीत साठवणूक केंद्रांची गरज यामुळे आगामी काळात द्राक्ष निर्यातीला आणखी गती मिळू शकते.
– संजय गवळी, द्राक्ष उत्पादक शेतकरी

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *