नाशिक : विशेष प्रतिनिधी
नाशिक जिल्हा म्हणजे देशाची वाइन कॅपिटल. देशातील एकूण उत्पादनापैकी सुमारे 80% वाइन नाशकात उत्पादित होते. देशातील एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 90% आणि त्यातील नाशिकचा वाटा 75% आहे. या वाइननिर्मितीसाठी लागणारे विशेष यीस्ट, मशिनरी आणि ओक बॅरल्स प्रामुख्याने युरोपमधून आयात केले जातात. इस्त्राईल-इराण आखाती युद्धामुळे सागरी मार्गावरील वॉर रिस्क
चार्जेस वाढल्याने वाहतूक खर्च वाढला आहे. कंटेनर परत येत असल्याने वाइन निर्यात विस्कळीत झाली आहे. एकूणच नाशिकमधील वाइन उद्योग सध्या नैसर्गिक संकटांसह (अवेळी पाऊस) भू-राजकीय तणावामुळे दुहेरी संकटाचा सामना करत आहे.
नाशिकचा वाइन उद्योग
यापूर्वी कोविड संकटाचा नाशिकच्या वाइन उद्योगाला फटका बसला होता. त्यानंतर गेल्या चार वर्षांत भारतातील द्राक्ष वाइन निर्यातीत सुमारे 80% वाढ झाली आहे. भारतातील वाइन क्षेत्रात महाराष्ट्राचे वर्चस्व आहे, एकूण द्राक्ष वाइन निर्यातीपैकी 90% पेक्षा जास्त निर्यात महाराष्ट्राकडून आणि राज्याच्या निर्यातीपैकी सुमारे 75% निर्यात नाशिमधून होते. अनुकूल वाढत्या परिस्थिती, स्थापित वाइनरीज आणि वाढती आंतरराष्ट्रीय मागणी यामुळे हा उद्योग बहरत आहे. 2014-25 मध्ये, सुमारे 35% निर्यात पाच प्रमुख बाजारपेठांमध्ये पाठवण्यात आली. यूएई (1.26 लाख लिटर), फ्रान्स (98,330 लिटर), चीन (48,410 लिटर), नेदरलँड्स (18,470 लिटर) आणि हाँगकाँग (16,430 लिटर). ऑल इंडिया वाइन प्रोड्यूसर्स असोसिएशननुसार, भारताची वार्षिक वाइन विक्री, देशांतर्गत आणि आयात केलेली, सुमारे 3.2 कोटी लिटर आहे, ज्यामध्ये आयात केलेली वाइन सुमारे 45 लाख लिटर किंवा एकूण वापराच्या 14.3% आहे.
वाइन उद्योगावर आयात-निर्यात आणि युद्धाचा परिणाम
आयात : वाइन उद्योगासाठी दर्जेदार यीस्ट, पॅकेजिंग मटेरिअल, ओक बॅरल्स (वाइन मुरवण्यासाठी) आणि प्रक्रिया यंत्रसामग्री प्रामुख्याने फ्रान्स, इटली आणि इतर युरोपीय देशांतून आयात केली जाते.
निर्यात : 2024-25 मध्ये भारताची द्राक्ष वाइन निर्यात 8.71 लाख लिटरपर्यंत वाढली आहे. नाशिकमधून प्रामुख्याने युरोप आणि आखाती देशांमध्ये वाइन निर्यात केली जाते. ही निर्यात आता घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपन्या उत्पादन स्लो-डाऊन करण्याची भीती आहे.
वाहतूक खर्च वाढ : युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी वाहतुकीवर वॉर रिस्क टॅक्स लागल्याने कंटेनरचा खर्च वाढला आहे.
निर्यात विलंब : आखाती देशांकडे जाणारी निर्यात रस्ते/सागरी मार्गावर रखडली आहे.
उत्पादन खराब होण्याची भीती : द्राक्षे आणि वाइन ही नाशवंत उत्पादने असल्याने, वाहतुकीस विलंब झाल्यामुळे मालाचे नुकसान होऊन निर्यातक आणि शीतगृहांच्या मालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
नफा कमी : कंटेनर परत येण्यामुळे प्रति कंटेनर सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचा अंदाज आहे.
Nashik’s wine industry also suffered from the Gulf War