निफाड तालुक्यातील 371 पैकी केवळ 74 शाळांमध्ये यंत्रणा
निफाड : विशेष प्रतिनिधी
राज्य शासनाने सर्व शाळांमधून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले असतानाही जिल्हा परिषदेंतर्गत येणार्या शाळांमधून याची कार्यवाही निधीअभावी संथगतीने सुरू आहे. वास्तविक, निफाड तालुक्यात खासगी असो अथवा शासकीय, प्रत्येक शाळेत कॅमेरे बसवणे अनिवार्य असतानाही जिल्हा परिषदेच्या 224 व खासगी 147 शाळा आहेत, अशा 371 पैकी जिल्हा परिषदेच्या फक्त 27 व खासगी 47 अशा 74 शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाली. उर्वरित 297 शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत, अशी धक्कादायक माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. परिणामी, शाळा परिसर व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
16 ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूर येथील शाळेमध्ये झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्हा परिषदेंतर्गत येणार्या शाळांमधून याची कार्यवाही संथ सुरू असल्याचे चित्र आहे. पुरेशा निधीअभावी सीसीटीव्ही बसविण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. शहरासह तालुक्यातील बहुसंख्य महाविद्यालयांत सीसीटीव्ही आहेत. मात्र, काही अपवाद वगळता अनेक शासकीय प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत असे कॅमेरे नाहीत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच ज्या ठिकाणी कॅमेरे आहेत, तिथे केवळ दिखाऊपणा न करता त्याची सातत्याने तपासणी होणे आवश्यक आहे. शाळेच्या आवारात, वर्गात चोरीच्या घटनाही घडत आहेत.
मुलींना छेडण्याचे आणि धमकाविण्याचे प्रकारही घडतात. मात्र, अनेकदा त्याची नोंदही होत नाही. त्यामुळे अशा प्रकाराला आळा घालण्यासह शाळांच्या आवारामध्ये सुरक्षा मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा आवश्यक आहे. राज्य शासनाने 10 मार्च 2022 रोजी याबाबत आदेश काढले होते. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. निफाड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 224 शाळा आहेत. त्यापैकी 27 शाळांत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. 197 शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत. याउलट खासगी शाळांनी सीसीटीव्हीबद्दल जागरूक असल्याचे दाखवून दिले आहे.निफाड तालुक्यात 147 खासगी शाळा आहेत. त्यापैकी 47 शाळांनी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे, तर 100 शाळा अद्यापही याबाबत
निरुत्साही आहेत.
बदलापूर घटनेनंतर शालेय शिक्षण विभागाने अॅक्शन मोडवर येत शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सक्ती केली. मात्र, अद्यापही तितकासा परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांत एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे काय? हा खरा प्रश्न आहे. रोग होण्याआधीच काळजी घ्यायची की, रोग झाल्यावर उपाय करायचा, याचा निर्णय इथल्या प्रशासनाने घ्यायचा आहे. कोणीतरी अन्यायाला बळी पडल्यानंतर प्रशासन जागे होणार असेल तर ते दुर्दैव असेल.
-राजेंद्र बोरगुडे, संचालक, कृउबा समिती, लासलगाव