मुंबई :
राज्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवार, दि. 9 मार्चपासून राज्यभर नवीन ऑटो रिक्षांना परवाने देण्यास स्थगिती देण्यात आली असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
मंत्रिमंडळासोबत चर्चा करून स्पष्ट धोरण (एसओपी) तयार केल्यानंतरच पुढे नवीन परवाने देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, राज्यातील मोठ्या शहरांमध्ये ऑटो रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. विशेषतः मुंबई व उपनगरांमध्ये रिक्षांचा सुळसुळाट झाल्याने वाहतुकीवर मोठा ताण येत आहे.
एसओपी तयार करून पुन्हा परवाने दिले जाणार
राज्यातील पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा परवान्यांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्थानिक परिस्थिती, वाहतुकीच्या गरजा आणि नागरिकांच्या सोयी लक्षात घेऊन लवकरच नवीन धोरण तयार करण्यात येईल. दरम्यान, या निर्णयामुळे राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवाने सध्या मिळणार नसून मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) निश्चित झाल्यानंतरच पुढील परवाने देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
New auto rickshaw licenses suspended in the state: Sarnaik