पिंपळगावला नवविवाहित दाम्पत्याची बैलगाडीतून वरात

शेतकरी असल्याचा अभिमान, पारंपरिक विवाह सोहळ्याचे दर्शन

पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी
शेतकरी असल्याचा अभिमान बाळगत पिंपळगाव येथील मोरे आणि पाटील या नवविवाहित दाम्पत्याने आपल्या लग्नाची वरात बैलगाडीतून आणत विवाह सोहळा आदर्श ठरवला आहे.
लग्न समारंभासाठी अनेक युवक वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कार्याची ओळख निर्माण करून देतात. गेल्या वर्षी नाशिक येथील एका लग्नात वरातीसाठी हेलिकॉप्टरमधून मंगल कार्यालयात जाऊन आगळीवेगळी चर्चा निर्माण केली होती. मात्र, पिंपळगाव बसवंत येथील नवरदेव शुभम मोरे आणि वधू ऋतुजा पाटील या वधू-वरांनी त्यांच्या लग्नाच्या वरातीत वेगळे काही करण्याचा निर्णय घेतला. आपले शेतीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी चक्क बैलगाडीमधून नवरी आणत घर गाठले. हायटेक विवाह सोहळ्यामुळे लग्नखर्चात वाढ झाली आहे. मात्र, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील मोरे व पाटील कुटुंबातील लग्नाची वरात चक्क बैलगाडीतून निघाल्याने पुन्हा एकदा पारंपरिक विवाह सोहळ्याचे दर्शन झाले. लग्न झाल्यावर नवरदेव आणि नवरी बैलगाडीतून घरी पोहोचत जुन्या परंपरेची आठवण करून दिली. त्यामुळे परिसरात या वरातीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर चर्चा

प्रत्येक जण बैलगाडीतून वरात मोबाइलमध्ये टिपून घेत होता. शुभम आणि ऋतुजाचे लग्न झाल्यावर बैलगाडीतून नवरी-नवरदेव पिंपळगाव घरी पोहोचले तेव्हा परिसरातील नागरिक बैलगाडीतून येणार्‍या नवदाम्पत्याला पाहून अवाक् झाले. कधी बैलगाडीतून येणारी वरात न बघणार्‍यांत कुतूहल निर्माण झाले. या वरातीचे अनेकांनी आपल्या मोबाइलद्वारे चित्रीकरण करत सोशल मीडियावर व्हायरल केले.

लग्नसोहळा ठरला आदर्श

येणार्‍या नवीन पिढीला बैलगाडी काय असते हेही सांगणे कठीण आहे. पुढील पिढीला तर बैलगाडी अशी होती, असे पटवून सांगावे लागेल. मात्र, मोरे व पाटील यांच्या या बैलगाडीतील वरातीचे चांगलेच कौतुक होत आहे. हा लग्न सोहळा आदर्श ठरला.

सध्या शेतकरी मुलाशी लग्न करण्यासाठी अनेक मुली नकार देतात. सगळ्या मुलींना आपले लग्न मोठ्या थाटामाटात व्हावे असे वाटते. मी जेव्हा माझ्या वधूला म्हणालो की, आपल्याला बैलगाडीतून घरी जायचे, तेव्हा ती अधिकच आनंदित झाली. शेतकरी असल्याचा अभिमान तिलादेखील वाटला.
– शुभम मोरे, वर (पिंपळगाव बसवंत)

शेतीत नवीन तंत्रज्ञान आल्याने सध्या बैलगाड्या लुप्त होत चालल्या आहेत. शहरातील नवीन पिढीला तर बैलगाडी
कशी असते हेदेखील माहीत नाही. शेतकरी असल्याचा अभिमान बाळगत माझ्या सासरच्या मंडळींनी बैलगाडीतून मोठ्या आनंदात मला घरी घेऊन गेले, हा आनंद आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे.
-ऋतुजा पाटील-मोरे, वधू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *