निमाणी बसस्थानक समस्यांचे आगार

प्रवाशांच्या आर्थिक फसवणुकीसह मनस्तापात भर

नाशिक ः प्रतिनिधी
शहरातील निमाणी बसस्थानक समस्यांचे आगार बनले असून, प्रवाशांना शहरात आल्यानंतर इच्छित स्थळी जाण्यासाठी रिक्षाचालकांकडून आर्थिक भुर्दंडासह मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.
आगामी सिंहस्थाच्या कामांमुळे शहरातील मुख्य रस्त्यांचे ड्रेनेज, गॅस पाइपलाइन आदींची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. बाहेरगावच्या बसेस निमाणी येथून सुटत असल्याने प्रवाशांचा गोंधळ होण्याबरोबरच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. रिक्षाचालक मनमानी भाडे आकारून प्रवाशांना इच्छित स्थळापासून दूर सोडणे किंवा इच्छित स्थळावर जाण्यासाठी चुकीची माहिती देणे, जास्त भाडे आकारणे, अरेरावीची भाषा करून प्रवाशांत भीती, संभ्रमाचे वातावरण निर्माण करीत
आहेत.
सिंहस्थाच्या कामांमुळे सीबीएस परिसरातील मुख्य बसस्थानक तात्पुरत्या कालावधीसाठी निमाणी येथे हलविण्यात आले आहे. शहर व उपनगरातील सिटीलिंकच्या बसेस तपोवनातून सुटत असल्याने प्रवाशांना याबाबत माहिती नसल्याने मिळेल त्या वाहनाचा आधार घेत प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांची अडवणूक होईल असे वर्तन रिक्षाचालकांकडून केले जातेे. रिक्षाचालकांच्या तक्रारींत वाढ झाली आहे. परिणामी प्रवाशांना आर्थिक भुर्दंडासह मनस्तापालाही सामोरे जावे लागते.
निमाणी बसस्थानकात दोन डेपोच्या गाड्या एकाच ठिकाणी येत असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतोे. गावांचे फलक लावूनही प्रवाशांचा गोंधळ कायम आहे. स्थानकाबाहेर आल्यानंतरही रिक्षाचालकांकडून फसवणुकीचे प्रकार होताना दिसतात. निमाणी बसस्थानकावर अस्वच्छता, कचर्‍यामुळे दुर्गंधीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोे.
निमाणी येथून येवला, लासलगाव, मनमाड, नांदगाव, पेठ, कळवण, सुरगाणा, सप्तशृंगगड, नवापूर, नंदुरबार आदी मार्गांवरील बसेस सुटतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी होतेे. तात्पुरत्या बसस्थानकावर तिकीट बुकिंगसाठी उन्हात ताटकळत उभे राहावे लागते. येथील कचराकुंडी, स्वच्छतागृहातील अस्वच्छता यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. गर्दीचा फायदा घेत रिक्षाचालक प्रवाशांची अडवणूक करीत असल्याचे चित्र आहे.

पुणे, कोल्हापूरसह इतर ठिकाणी जाणार्‍या बसेस नाशिक शहरात येताना पूर्वी ठक्कर बझार व मेळा बसस्थानकात येत होत्या. त्यामुळे प्रवाशांना आपल्या घरी किंवा नातेवाइकांकडेे जाताना सिटीलिंक बस किंवा रिक्षाने जाणे सोपे होत होते. आता शहरात येणार्‍या बसेस निमाणी बसस्थानकावर थांबतात. त्यामुळे प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी निमाणी येथून रिक्षा किंवा सिटीलिंकच्या बसेसद्वारे पुढील प्रवास करावा लागतो.

Nimani bus stand is a hotbed of problems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *