निफाडला ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद 

लासलगावकर गारठले

लासलगाव:समीर पठाण

उत्तरेकडून येणाऱ्या शितलहरी मुळे काल रात्रीपासून लासलगाव व परिसरात थंडीचा जोर वाढला असून कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात झालेल्या नोंदीनुसार निफाड तालुक्यातील थंडीचा सरासरी पारा ५ अंशांवर स्थिरावला आहे.या थंडीमुळे लासलगावकर भलतेच गारठले आहे.वाढलेल्या थंडीमुळे गहू,हरभरा या रब्बीच्या पिकांना फायदा होत असला तरी द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढणार आहे.सकाळपासूनच वातावरणात असलेला गारठा अन्‌ दिवसभर गार वाऱ्यांची झुळूक यामुळे सायंकाळच्या थंडीने बोचरे रूप धारण केल्याचे जाणवायला लागले आहे.पुढील ४८ तासात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

मागच्या वर्षी परतीच्या पावसाने अक्षरशःथैमान घातले होते.संपूर्ण निफाड तालुक्यासह लासलगाव व परिसरात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मका,सोयाबीन तसेच कांद्यासह भाजीपाला पीके पाण्यात वाहून गेले.अगदी दिवाळीनंतरही पाऊस सुरू होता त्यामुळे येणाऱ्या काळात थंडीचा असाच जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.या कडाक्याच्या थंडीने लासलगाव शहर गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून नागरिक उब मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

मागील सप्ताहात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडी गायब झाली होती.यामुळे तापमान १५-१६ अंश सेल्सिअस नोंदविले जात होते.परिणामी फारशी थंडी जाणवत नव्हती.परंतु गेल्या दोन दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या शितलहरी मुळे तापमान खाली येत गेल्याने थंडीत वाढ झाली आहे.काल रात्रीपासून गारठ्यात अधिक वाढ झाल्यामुळे थंड वाऱ्याची झुळूक येत असल्याने गारवा अधिक जाणवू लागला आहे.

…..उबदार कपड्यांना मागणी……..

थंडीचा जोर वाढू लागल्याने उबदार कपड्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे.दिवसभर थंडी जाणवत असून,दिवसभर अंगात स्वेटर घातले जात आहे.वाढलेल्या थंडीमुळे लासलगाव शहरातील विक्रेत्यांकडे उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.कानटोपी,स्वेटर,जॅकेट,हातमोजे यांची मागणी अधिक वाढली आहे.

…….हरभरा,गहूला फायदा…….

वातावरणात गारठा निर्माण झाल्याने रब्बी पिकांना या थंडीचा मोठा फायदा होईल.यात प्रामुख्याने गहू, हरभरा या पिकांची वाढ जोमाने होण्यास मदत होईल. सुरवातीपासूनची थंडी या पिकांना पोषक ठरून थंडीचे प्रमाण कायम राहिल्यास उत्पादनात वाढीची आशा आहे.परंतु ही थंडी अधिक कमी झाल्यास त्याचा फायदा या पिकांना होणार आहे.मात्र,सद्यःस्थितीत असलेले तापमान रब्बी पिकांसाठी फायद्याचे आहे.

……द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण…….

निफाड तालुक्यात द्राक्षबागांचा हंगाम तोंडावर आला आहे.सध्याचे हवामान द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढविणारे आहे.या हवामानात भुरीचाही प्रादुर्भाव वाढणार असल्याने बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे.त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे.वाढलेली थंडी रब्बी हंगामासाठी पोषक मानली जात असली तरी द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधील द्राक्ष उत्पादनावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *