अमित ठाकरेंचा प्रशासनाला इशारा
महापौरांशी चर्चा; पर्यावरणप्रेमींच्या मोर्चात सहभाग
नाशिक : प्रतिनिधी
तपोवनातील साधुग्राममधील झाडे कशासाठी तोडायची आहेत, यापूर्वी नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असतानाही त्यावेळीही सिंहस्थ कुंभमेळा झाला. परंतु, तेव्हा कुठलीही झाडे तोडण्याची वेळ आली नाही. मग प्रशासनाला यंदाच्या सिंहस्थातच का झाडे तोडायची आहेत, ते काहीही असो, तपोवनातील एकही झाड तोडता कामा नये, असा इशारा मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांनी प्रशासनाला दिला.
वृक्षप्रेमींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे गुरुवारी (दि.12) शहरात आले होते. यावेळी हुतात्मा स्मारक येथून वृक्षप्रेमींनी मोर्चा काढला असता, त्यात ते सहभागी झाले होते. सकाळी 11 वाजता मोर्चा राजीव गांधी भवन प्रवेशव्दारावर धडकला. दरम्यान, यावेळी आयुक्त मनीषा खत्री नसल्याने महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे यांची ठाकरे यांच्यासह पर्यावरणप्रेमींनी भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी महापौर आहेर-आडके यांच्याशी बोलताना म्हटले की, तुम्हाला आत्ताच झाडे का कापायची आहेत? अगोदर त्याचे उत्तर द्या. तोपर्यंत रात्री-अपरात्री एकही झाड कापू नका, असेही त्यांनी म्हटले. झाडांसंदर्भातला निर्णय आयुक्तांचा असल्याचे महापौर आहेर-आडके यांनी सांगितले. तसेच मीदेखील तुमच्यासोबत असून, यावर चर्चा करण्यासाठी समन्वय समिती गठित करण्याची सूचना केली. त्यावर ठाकरे यांनी समितीची बैठक होईपर्यंत एकही झाड कापू नये, अशी इच्छा महापौरांकडे व्यक्त केली. यावेळी झालेल्या चर्चेत अमित कुलकर्णी, शीतल आडके, राजू देसले, मनोज साठे, पर्यावरणप्रेमींसोबतच मनसेचे अंकुश पवार, सुदाम कोंबडे, अमित गांगुर्डे, मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी पर्यावरणप्रेमींनी प्रशासनावर आरोप करताना म्हटले की, आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलनास बसलेलो आहोत. परंतु, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. तपोवनातील 1600 झाडांबाबत अधिकृत माहिती दिली जात नाही. माईस हबबाबत खुलासा केला जात नाही. तपोवनातील 5 ते 6 हजार वृक्ष तोडण्याचा घाट घातला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, विदेशी झाडांचा उल्लेख करून वड, उंबर, पिंपळ, चिंच यांसारखी झाडे तोडण्याचा घाट प्रशासन घालत असल्याचा आरोप करण्यात आला.
आयुक्तांच्या अनुपस्थितीबाबत अमित ठाकरेंचा सवाल
नाशिकमध्ये वृक्षप्रेमींनी मांडलेले मुद्दे योग्य असून, त्यांच्यासोबत आम्ही आहोत. मात्र, यासंदर्भात आम्ही आयुक्तांना भेटण्यासाठी आलो असताना, त्या येथे नसल्याचे समजले. महापौरांना भेटलो असता, त्या सांगतात वृक्ष प्राधिकरण समितीच्या अध्यक्ष आयुक्त असल्याने हा विषय त्यांच्याकडे आहे. हे म्हणजे निवडणूक आयोगासारखे झाले. तुम्ही केंद्राकडे जा, केंद्र म्हणते तुम्ही राज्य आयोगाकडे जा. मला समजत नाही, हे असे का करतात. मात्र, येथे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात नसल्याचे जाणवत असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले.
मंगळवारी बैठकीचे आयोजन ः महापौर आहेर-आडके
साधुग्राम कशा पद्धतीने झाले पाहिजे, यावर चर्चा करण्यासाठी येत्या सोमवार-मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. जरी महापौरांच्या खुर्चीत असले तरी मी नागरिकांचीच प्रतिनिधी आहे. याविषयी चर्चा करण्यासाठी समन्वय समिती स्थापन करून त्यात सदस्यांच्या भावना जाणून घेतल्या जाणार असल्याचे महापौरांनी म्हटले.
Not a single tree in the Tapovan should be cut down!