चालक-मालकांचे चारित्र्य पडताळणी आता अनिवार्य
पंचवटी : प्रतिनिधी
बदलापूरमधील धक्कादायक घटनेने राज्य हादरले असतानाच, आता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. शालेय वाहतुकीतील गंभीर त्रुटी दूर करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, आता प्रत्येक स्कूल व्हॅन चालकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासोबतच पिवळी नंबरप्लेट नसलेल्या गाड्यांवर थेट बंदी घालण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक (मुख्यालय) सुनील भारद्वाज यांनी राज्यभरातील पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश
दिले आहेत.
शाळा आणि वाहनचालकांसाठी प्रशासनाने आता नवी नियमावली स्पष्ट केली आहे. त्यात शाळांना आता सर्व वाहनचालक, मालक यांचे नाव, मोबाइल क्रमांक आणि मार्गांची संपूर्ण माहिती ठेवणे सक्तीचे आहे. ही सर्व माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणे शाळांसाठी बंधनकारक असेल. चालकाचा अनुभव, त्याचे वर्तन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही ना, याची पोलीस व्हेरिफिकेशनद्वारे खातरजमा करावीच लागेल. सर्व शालेय वाहने सार्वजनिक वाहतूक श्रेणीत नोंदणीकृत असावीत. नियमांचे उल्लंघन केल्यास थेट ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरटीओ नोंदणी रद्द केली जाईल. अनधिकृत किंवा नोंदणी नसलेल्या वाहनांतून विद्यार्थ्यांची ने-आण केल्यास संबंधित शाळा आणि वाहन मालकावर कठोर दंडात्मक कारवाई होईल. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहनात प्रशिक्षित महिला परिचारिका किंवा मदतनीस असणे आता अनिवार्य आहे.
Now there are seven rules for the safety of children in school vans