फेब्रुवारीचा महिना उजाडला की, घरोघरी एका अघोषित युद्धाची तयारी सुरू होते, ती म्हणजे ‘बोर्ड परीक्षा’. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होणारा हा काळ केवळ विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेणारा नसून, तो पालकांच्या संयमाचा आणि संपूर्ण कुटुंबाच्या धैर्याचा कस पाहणारा काळ आहे. पण खरंच बोर्ड परीक्षा म्हणजे ‘भयावह संकट’ आहे की अनंत ‘संधींचा उंबरठा’?
गुणांच्या चौकटीपलीकडचा विचार
आज आपण सर्वजण एका अशा तीव्र स्पर्धेत अडकलो आहोत जिथे पाल्याची बुद्धिमत्ता ही केवळ त्याच्या गुणपत्रिकेवरून मोजली जाते; परंतु शिक्षण क्षेत्रातील एक कार्यकर्ता म्हणून मी ठामपणे सांगेन की, बोर्ड परीक्षा ही केवळ गुणांच्या चौैकटीत अडकून राहण्यासाठी नाही, तर ती स्वतःच्या क्षमतांचे अथांग आकाश शोधण्याची पहिली पायरी आहे. विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा तुमच्या आयुष्याचा ‘निकाल’ लावत नाही, तर तुम्हाला भविष्यातील आव्हानांसाठी ‘सिद्ध’ करते.
स्मरणशक्तीकडून आकलनशक्तीकडे
आता परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यावर ‘काय वाचायचे?’ यापेक्षा ‘कसे वाचायचे?’ याला अधिक महत्त्व आहे. केवळ पाठांतर म्हणजे अभ्यास नव्हे.
स्मरणतंत्राचा वापर : आपल्या अभ्यासक्रमातील धड्यांचे रूपांतर ‘माइंड मॅप’मध्ये करा. क्लिष्ट संकल्पना रंगीत आकृत्यांच्या माध्यमातून डोळ्यासमोर उभ्या करा. असे केल्यास अभ्यास चांगला लक्षात राहतो.
लेखनाचा सराव : बोर्ड परीक्षेत बोलत नसता, तुमची लेखणी बोलत असते. त्यामुळे प्रत्येक मुद्याची मांडणी आणि सुबक आकृत्या तुमच्या उत्तरपत्रिकेला एक वेगळीच झळाळी देतात. परीक्षकाला तुम्हाला परिपूर्ण गुण द्यावेच लागतात.
वेळेचे व्यवस्थापन : यशाचे अदृश्य सूत्र
वेळ ही वाळूसारखी निसटणारी असते. विशेषतः परीक्षा हॉलमध्ये. प्रश्नपत्रिका हातात आल्यावर पहिली दहा मिनिटे केवळ वाचनासाठी नव्हे, तर उत्तरलेखनाची ‘रणनीती’ आखण्यासाठी वापरा. सोपे प्रश्न आधी सोडवून आत्मविश्वास वाढवून घ्या. घरी अभ्यास करताना ‘45:10’चा नियम पाळा. 45 मिनिटे एकाग्र अभ्यास आणि 10 मिनिटे मेंदूला विश्रांती. लक्षात ठेवा, विश्रांती म्हणजे मोबाइल अथवा टीव्ही नव्हे, तर डोळे मिटून केलेले अभ्यासाचे चिंतन होय.
अपेक्षांचे ओझे की आश्वासक साथ?
पालकांनो, तुमची मुले सध्या एका भावनिक दबावाखाली आहेत. तुला इतके टक्के मिळालेच पाहिजेत, या वाक्यापेक्षा तू प्रामाणिक प्रयत्न कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, हा विश्वास त्यांना अधिक बळ देतो. घरातील वातावरण अभ्यासाला पूरक आणि शांत ठेवा. मुलांची तुलना इतरांशी करणे थांबवा. कारण प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे.
आरोग्य हाच खरा आधार
तुमचा मेंदू तेव्हाच उत्तम चालतो जेव्हा तुमचे शरीर साथ देते. या दिवसांत जंकफूडला पूर्णतः सुट्टी द्या. पुरेसे पाणी आणि किमान सात तासांची शांत झोप ही तुमच्या एकाग्रतेची गुरुकिल्ली आहे.
अखेरचा मंत्र…
प्रिय विद्यार्थ्यांनो, बोर्डाची परीक्षा ही तुमच्या आयुष्यातील एक ‘स्वल्पविराम’ आहे; ‘पूर्णविराम’ नव्हे. उत्तरपत्रिकेवर उमटलेले आकडे तुमचे भविष्य ठरवू शकत नाहीत; परंतु तुम्ही दाखवलेली जिद्द आणि चिकाटी तुम्हाला नक्कीच महान बनवेल. शांत राहा, सकारात्मक राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण आभाळात झेप घेणार्या पाखरांना कवाडांची भीती नसते.
On the threshold of exams: Towards the horizon of a bright future