नाशिक : अश्विनी पांडे
पांजरापोळ जागेच्या आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. उद्योजक आणि पांजरापोळ संस्था यांच्यात संघर्ष सुरू आहे. मात्र, मागील आठवड्यात नाशिकच्या उद्योजकांची आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत उद्योगमंत्र्यांनी पांजारापोळचा सद्यस्थितीचा अहवाल येत्या पंधरा दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून हालचालीही सुरू झाल्या आहेत.
परिणामी पांजरापोळच्या आरक्षणावरून शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाने सावध भूमिका घेत वृक्षसंवर्धन करूनच उद्योगांना जागा देण्यात यावी असे स्पष्ट केले आहे. तर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच पांजरापोळची जागा उद्योगासाठी देण्यास विरोध केल्याने नाशिक मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. उद्योजकांकडून पांजरापोळसाठी शहराच्या बाहेर ग्रामीण भागात जागा देत वृक्ष आणि पशुधनाचे संवर्धन करावे, असे मत मांडण्यात येत असताना पांजरापोळकडून ग्रामीण भागात उद्योगांची अधिक गरज असून, तिथे नवीन उद्योग आले तर ग्रामीण भागातील तरूणांना रोजगार उपलब्ध होतील अशी भूमिका मांडण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पांजरापोळची जागा बिल्डरला विकल्याचा आरोपही करण्यात आला होता, मात्र यावर पांजरापोळनी नकार दिला आहे. त्यामुळे पांजरपोळचे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. येत्या काळात ते स्पष्ट होणार असले तरी सद्या शहरात पांजरापोळवर वेगवेगळ्या संघटना ,पक्ष ,संस्था यांच्याकडून मतमतांतरे व्यक्त करण्यात येत आहेत.
अशी आहे पांजरापोळची स्थिती
पांजरापोळ येथे सुमारे अडीच लाख झाडे आहेत.तसेच या जागेवर अडीच लाख झाडे असून, गोशाळेत दीड हजार पशुधन आहे. पांजरापोळ परिसरात साडेतीनशहून अधिक विविध जाती प्रजातीच्या वनस्पती आहेत. अनेक पशुपक्षी व इतर वन्यजीव या परिसरात आहेत. सद्यस्थितीत पांजरापोळमध्ये 1400 गाई आहेत. त्यात 144 गीर गाई तर 88 डांगी गाईंचा समावेश आहे. या सोबतच जर्सी, एचपी क्रॉस बीड अशा विविध जातीच्या गायी आहेत.
पांजरापोळमध्ये असणारे प्रकल्प
रेन वॉटर हार्वेस्टिंगचे 26 शेततळे, जलचर, गांडूळखत प्रकल्प, मधमाशी पालन प्रकल्प, संस्थेच्या 1400 गायींसाठी प्रमाणित सेंद्रीय पशुचारा उत्पादन क्षेत्र, 450 कि.वॅ.चा सौरविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. शिवाय मोठी गोशाळा या ठिकाणी आहे.
शहराचे फुफ्फुस
पांजरापोळ हे शहराचे फुफ्फुस आहे. शहरातील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यास पांजरापोळमधील वृक्षांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शहराचे फुफ्फुस टिकले नाही तर शहराचे आरोग्य खराब होईल असा सूर उमटत आहे.
औद्योगिक वसाहतीत रिकामे भूखंड अन बंद उद्योग
शहरातील जे उद्योग बंद पडले आहे. त्यांचे पुर्नजिवन करण्याची गरज आहे.. सातपूर,अंबड औद्योगिक वसाहतीत मोठया प्रमाणात रिकामे भूखंड पडलेले आहे. ते भूखंड नवीन उद्योजकांना दिल्यासही शहरात उद्योग येतील. असे मत ही अनेकांकडून मांडण्यात येत आहे.
शहराच्या विकासाला चालना मिळेल
शहरात जागा नसल्याने अनेक उद्योग दुसर्या शहरात जात आहे. नाशिकमध्ये जर उद्योगसाठी जागा मिळाली तर नाशिकच्या विकासात भरच पडेल. आम्ही वृक्षसंवर्धनाच्या बाजुनेच आहोत. वृक्ष तोडण्यास आमचाही ठाम विरोध आहे.
-धनंजय बेळे, (अध्यक्ष निमा)
जागा उद्योगासाठी देण्यास ठाम विरोध
पांजरापोळची जागा उद्योगासाठी देण्यास आमचा ठाम विरोध आहे. कारण शहरातील सातपूर अंबड परिसरात अनेक भूखंड रिकामे असताना पांजरापोळचा आग्रह करणे चुकीचे आहे. तसेच अनेक उद्योग बंद पडले आहेत. अशा उद्योगांना पुर्नजिवीत केल्यास शहराच्या विकासााला चालना मिळेल.मनसे विकासाच्या बाजूनेच आहे.पण पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे संवर्धन करत विकास करणे ही आमची भूमिका आहे.
– दिलीप दातीर (शहराध्यक्ष, मनसे)अहवालानंतरच पांजरापोळसंदर्भात निर्णय
उद्योगमंत्र्यांच्या बैठकीत पांजरापोळच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पंधरादिवसात उद्योगमंत्र्यांसमोर आवाहल सादर करण्यात येईल.त्यानंतरच पांजरापोळसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
-नितीन गवळी (प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी)
पर्यावरणाचा र्हास करून होणारा विकास नको
आमचा विकासाला विरोध नाही पण पांजरापोळवर उद्योगाच्या विकासाला विरोध आहे.पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत अनेक वेळा जनजागृती करण्यात येते असे असतताना आपल्याकडे नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या जैवविविधतेवर घाला घालणे े चुकीचे आहे. विकास होण्याची आवश्यकता असली तरी पर्यावरणाचा र्हास होऊन होणारा विकास अदोगतीकडेच नेणारा असतो.
– राजेश पंडित (अध्यक्ष, नमामि गोदा फाउंंडेशन )
वस्तुनिष्ठ अहवालानंतर निर्णय
वृक्षसंवर्धन करूनच विकास करायला हवा ही आमची भूमिका. पांजरापोळच्या जागेसंदर्भात समितीच्या वस्तुनिष्ठ अहवालात असेल उद्योगासाठी जागा घेता येणे शक्य आहे तर जागा घ्यावी. अहवालात पांजरापोळची सद्य स्थिती समजल्यावर शासनाकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
-प्रदीप पेशकार (भाजपा)अहवालानंतरच भूमिका
आमची भूमिका पर्यावरण संवर्धनाच्या बाजूने आहे. पंधरा दिवसांत जो अहवाल येईल त्यानंतर भूमिका मांडणे उचित ठरेल.
-सीमा हिरे (आमदार, भाजपा)
भूखंडाचा श्रीखंड लाटण्याचा प्रयत्न
825 एकर जागेचा भूखंडाचा श्रीखंडाचा लाटण्याचा हा प्रयत्न आहे. शहरातील बेरोजगारी कमी करायची असल्यास सातपूर अंबड एमआयडीसीत झालेला भ्रष्टाचार आणि बंद पडलेले उद्योगांचा सर्वे करून गरजू उद्योजकांना ते भूखंड द्यावे.
-जितेंद्र भावे
(आम आदमी पार्टी )जागा सरकारची नसून, पांजरापोळ संस्थेची
पांजरापोळ ही संस्था अनेक वर्षापासून पशुधन आणि वृक्षांचे संवर्धन करते अशा परिस्थितीत ती जागा उद्योगांना देत जैवविविधता नष्ट झाल्यास नाशिकच्या फुप्फुस नष्ट होईल. शहरातील वातावण अल्हादायक राहण्यास वृक्षांचा मोठा वाटा आहे. तसेच पांजरापोळची जागा ही सरकारची नसुन पांजरापोळ संस्थेची आहे. ती जागा कोणत्याही ब्लिडरला विकली नाही. जागा ब्लिडरला विकली असल्याचा आरोप खोटा आहे.
-हितेश जवेरी (ट्रस्टी, पांजरापोळ संस्था )