जिल्ह्यतील बाजार समित्यांसाठी अखेरच्या दिवशी विक्रमी अर्ज

नाशिक ः  जिल्ह्यातील 14  कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि.3) एकूण  2421 अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी अर्जांची (दि.5)  छाननी होणार असून, 20 एप्रिलला अर्ज माघारीनंतर खर्‍या अर्थाने चित्र स्पष्ट होणार आहे.
उमेदवारी निश्‍चित करून सर्वत्र पॅनल निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. बर्‍याच काळापासून रखडलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांना मुहूर्त लागल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली. स्थानिक राजकारणात आपले वर्चस्व राखण्यासाठी बाजार समिती महत्वाची मानली जाते. या माध्यमातून थेट स्थानिक शेतकर्‍यांच्या संपर्कात राहता येते. त्यामुळे राजकीय पक्षांचे बडे नेते बाजार समितीची निवडणूक गांभिर्याने घेतात. त्याचे प्रत्यंतर बाजार समित्यांचे उमेदवारी अर्ज दाखल होण्यावेळी येत आहे.
जिल्ह्यातील सुरगाणा बाजार समितीसाठी 25 , देवळा 147, घोटी 160, पिंपळगाव 309  चांदवड 193 , नाशिक 175
येवला 217, नांदगाव 148, सिन्नर 180, कळवण 132
मनमाड 150, मालेगाव 202, लासलगाव 211
दिंडोरी 172 असे एकूण  2421 अर्ज प्राप्त झाले आहेत. सहकारी संस्था गटात 1458, ग्रामपंचायत 680 , व्यापारी 185
हमाल मापारी 98 अर्जाचा समावेश आहे.
नाशिक, पिंपळगाव, लासलगावसाठी प्रतिष्ठेची लढत रंगणार
जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांची निवडणूक होणार असली तरी पिंपळगाव, लासलगाव आणि नाशिकच्या लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी या निवडणुकीत पुन्हा आमने सामने येणार आहे. त्यातही आजी माजी आमदारांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यंदाच्या निवडणुकीत शिंदे गटानेही उडी घेतल्याने लढत रंगतदार होणार आहे. पिंपळगावमध्ये दिलीप बनकर विरुद्ध अनिल कदम तर नाशिकमध्ये पिंगळे विरुद्ध चुंभळे असा सामना पाहावयास मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *