पितृपक्षातच कावळ्यांचे स्मरण?

तसा कावळा सजीवसृष्टीत नावाप्रमाणेच काळा पृष्ठवंशीय पक्षी होय. कावळा आणि मानवाचे जन्मोजन्मीचं नातं असं समीकरण. कावळा आणि मानवी नातं हे कसे काय म्हणायचे, असे आपल्याला वाटतच असेल! आपण आपल्या बालपणी नाही का? कावळ्याला ‌’कावळेदादा‌’ आणि चिमणीला ‌’चिऊताई‌’ म्हणायचो. हो, तिथूनच आपलं नातं सुरू होतं आणि मृत्यूनंतरही प्रतिवर्षी येणाऱ्या पितृपक्षात त्यांचे स्मरण होतेच ना..! मग आहे की नाही, जन्मोजन्मीचं नातं. कावळ्याचा आणि आपला परिचय होतो तो ‌’कावळ्याचं घर शेणाचे, चिमणीचं घर मेणाचे‌’ बालकथेतून. पुढे हा कावळा जणू मानवी सहजीवनाचा भाग बनतो. अर्थात त्याला कुत्रा, मांजरी, पोपटासारखे त्यांचे पालन करीत नाही. कारण त्याला पूर्वपार रूढीनुसार मानवाने शुभ/अशुभ म्हणून तर कधी ‌’बिच्चारा‌’ असं ठरवून त्याला दुर्लक्षित केलं आहे. पक्षितज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कावळा उष्टकटिबंधीय प्रदेशात वावरतो. तो समूहात राहणे पसंत करतो. तसे त्यास सामुदायिक इतर सहकाऱ्यांच्या धोक्याची सूचना आणि पूरकअन्न शोधण्यासाठी एकमेकांशी संवाद करतात. कावळ्यांच्या उत्क्रांतीचा इतिहास खूप जुना आहे, असे सांगितले जाते. म्हणून त्याचा उल्लेख पौराणिक कथेतसुद्धा आढळतो. संत वाङ्मयातसुद्धा त्याचा उल्लेख आढळतो. कावळे हे पूर्वाश्रमीचे जंगलातले पक्षी होते. लोक वस्तीत राहून त्यांची जीवनशैली बदलली आहे.कावळ्यांनी आपल्या अधिवासात राहून अनेक परिस्थितींशी जुळून घेतले आहे. मानवी वस्त्यांत राहून अन्न शोधणे, घरटे बनविणे, शिकारींपासून संरक्षण करणे शिकले आहे. कावळा पर्यावरणीय संरक्षणात अत्यंत मोलाची भूमिका बजावतो. त्याला सर्वभक्षी म्हणून बघितले जाते. मानवी वस्त्यांतील अन्नांचे तुकडे, कीटक, मृतप्राणी, फळे, धान्य, शिवाय स्वच्छ पाणी पितो. त्याच्या आहारात विविधता असून, ते स्वतः अन्नाचा शोध घेतात. जिथे अन्नाची उपलब्धता आहे तिथे इतर कावळ्यांनाही बोलावतो. आज मानवाची झपाट्याने बदललेली जीवनशैलीच्या परिणामाने शहरीकरणाच्या रूपाने कावळ्यांच्या नैसर्गिक अधिकारांवर विपरीत परिणाम होत आहे.सतत होणारी वृक्षतोड कावळ्यांचे अधिवास संपुष्टात आणत आहे. त्यांच्या अधिवासातील बदलांमुळे काकवंशावर मोठा विपरीत परिणाम होताना दिसतो. त्यांच्या नैसर्गिक अन्नस्रोताच्या अभावामुळे कावळ्यांची दर्शन दुर्लभ होऊन बसले आहे. कोणी एकेकाळी या झाडांवरून दुसऱ्या झाडांवर सतत फिरणारे थवे आज दुर्लभ झालेले दिसतात. कावळे साधारणत: जून ते सप्टेंबर या काळात झाडावर घरटे बांधतात. अर्थात, त्यांचा हा विणीचा हंगाम मानला जातो. आजही जुने जाणते शेतकरी कावळ्याचे घरटे किती उंचीवर आहे यावरून यंदा पर्जन्यमान कसे असेल, याचा अचूक अंदाज बांधतात. सजीवसृष्टीतला प्रत्येक पशुपक्षी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोलाची भूमिका बजावत असतात. त्यात कावळ्यांचे अढळ स्थान आहे. आज होणारी बेसुमार वृक्षतोड, हवेतील प्रदूषण, सगळीकडे होणाऱ्या कीटकनाशकांच्या वापरामुळे सजीवसृष्टी आज धोक्यात आली आहे. पर्यावरणाविषयी आजही मनुष्यप्राणी गाफिल आहे. हे जर असेच चालत राहिले, तर भविष्यातील पिढीला पितृपक्षात दर्भाचा कावळा करावा लागेल काय? हा प्रश्न आज पडताना दिसतो. – शशिकांत तोटे
तरुणांपुढे संकट?
शिक्षण संपल्यावर नोकरी लागणे आवश्यक असते. पूर्वी नोकऱ्या उपलब्ध होत्या. शासकीय नोकरी मिळत होती. पण वाढती लोकसंख्या, नोकऱ्यांची कमी संख्या यामुळे आता मिळेल ती नोकरी करावी लागते. औद्योगिक क्षेत्रात कंपनीत नोकरी मिळते. पण वाढते कंत्राटीकरण कमी पगार व जास्त ड्यूटी अशा नोकऱ्या आणत आहे. त्यातून कायम केले जात नसल्याने पुढील भवितव्य काय? कायम नोकरी नसेल तर तरुणांची लग्ने जुळत नाहीत. अशा अनेक समस्या आहेत.
– प्र. मु. काळे, नाशिक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *