नाशिक : प्रतिनिधी
गोदावरी नदीवरील सायखेडा येथील पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून, या पुलावरुन केव्हाही वाहन कोसळू शकते. त्यामुळे या पुलावरुन वाहन चालवत असाल तर सावधान, असे म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे. या पुलावर तात्पुरते रिफ्लेक्टर न बसविल्यास शिवसेना स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायतीचे सदस्य अश्पाक शेख यांनी दिला आहे.
गोदावरीला नुकताच पूर येऊन गेला. त्यामुळे सायखेडा पुलावर असलेले लोखंडी गार्ड उघडे पडले आहेत.पाच ते सहा ठिकाणी पुलावर खटक्या पडल्या आहेत. या पुलावर दोन्ही बाजूंनी पुराचा गाळ साचला आहे. या पुलाला कठडे नसल्याने दुचाकी अथवा कार थेट नदीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे साईडपट्टया दुरुस्त करण्याबरोबरच कठडे अथवा लोखंडी रेलिंग बसविणे गरजेचे झाले आहे. परंतु प्रशासनाचा दुर्लक्षामुळे निष्पाप प्रवास करणार्या लोकांना इजा पोहोचत आहे. पुलाला असलेले लोखंडी कठडे सद्या प्रशासनाने काढून टाकले आहेत. त्यामुळे पुलावरुन दुचाकीस्वार रात्रीच्या अंधारात थेट नदीमध्ये कोसळू शकतो. त्यासाठी तात्पुरते रिफ्लेक्टर उभे करणे गरजेचे आहे जेणेकरून रात्रीच्या वेळेस पुलाच्या दोन्ही बाजू समजून येतील तातडीने उपाय योजना न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा सायखेडा ग्रामपंचायतीचे सदस्य अश्पाक शेख यांनी दिला आहे.