ना .सामंत यांच्या बैठकीत उद्योजकांना दिलासा

नाशिक :प्रतिनिधी
अंबड एमआयडीसीचे फायर स्टेशन महानगरपालिकेकडे हस्तातंरण करण्याच्या आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले होते. सामंत यांच्या आदेशामुळे उद्योजकांना आता मनपा आणि एमआयडीसी या दोनही संस्थांना फायर कर देण्याची गरज पडणार नाही. शासनाच्या या निर्णयामुळे उद्योजकांमध्ये समाधान व्यक्त केले आहे.

काही महिन्यांपासून नाशिक औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी काल बुधवार (दि.7)उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री दादा भुसे,खासदार हेमंत गोडसे,राज्याच्या उद्योग विभागाचे बिपीन वर्मा, जिल्हाधिकारी डी. गंगाथरण, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, ज्येष्ठ उद्योजक धनंजय बेळे ,नामकर्ण आवारे, आयमाचे सरचिटणीस ललित बुब, संदीप कांकरिया,राजेंद्र पानसरे, सुधाकर देशमुख ,राजेंद्र वडनेरे आदी मान्यवर उपस्थित होते. तीन दिवसांपूर्वी उदय सामंत हे उद्योजकांच्या बैठकीसाठी नाशिकला आले होते.त्यावेळी दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांनी सातपूर आणि अंबड येथील उद्योजकांच्या विविध अडचणी उद्योगमंत्री सामंत यांच्या कानावर घातल्या होत्या. याची दखल घेत ना. सामंत यांनी काल मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन केले होते.

अंबड औद्योगिक वसाहती मधील फायरसेस, मल्टी मॉडल लॉजिस्टीक पार्क,सामाईक पाणी प्रक्रिया केंद्र( सीईटीपी ), सांडपाणी प्रक्रिया केंद्र, एसटीपीआय, दिल्ली -मुंबई औद्योगिक कोरिडोर ( डीएमआयसी ),मालमत्ता कर, घरपट्टी, गुंतवणूक,विशेष निधी ,हवाई वाहतूक ,औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन,औद्योगिक प्रदर्शनासाठी कायमस्वरूपी जागा,एलबीटी कर निर्धारण,सिन्नर पेथील इंडियाबुल्स प्रकल्पाची वायरात नसलेली जागा परत मिळावी,विविध योजनांमधील शासनाकडे थकित असलेला इंसेटिव्ह उद्योजकांना मिळावा, सोलर उंचीची वाढ होण्यासाठी चालू असलेली शासनाची इन्सेंटिव्ह स्कीम यापुढेही कायम सुरू रहावी, नवीन उद्योग, प्रकल्पांना अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *