रानवड कारखान्याच्या गळीताला ‘संजीवनी’ची नवी झेप

बिपिन कोल्हेंच्या हस्ते शुभारंभ; आधुनिकीकरणासह सहप्रकल्प राबविण्याची घोषणा

निफाड : विशेष प्रतिनिधी
रानवड येथे कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा नवा गळीत हंगाम मंगळवारी उत्साहात सुरू झाला. कोपरगावमधील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने हा कारखाना पुढील वीस वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर, ‘संजीवनी’ उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते आणि योगीराज तुकारामबाबा खेडलेकर, खेडलेझुंगे संस्थानचे केशव महाराज शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हंगामाचे औपचारिक उद्घाटन
करण्यात आले.
अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे म्हणाले की, “कर्मवीर काकासाहेब वाघांचा अपूर्ण राहिलेला सहकार स्वप्नपूर्तीचा ध्यास आम्ही घेतला आहे. आर्थिक नफ्यापेक्षा काकासाहेबांच्या कार्याला नवी दिशा देणे आमचे ध्येय आहे.” कारखान्याच्या सर्वांगीण आधुनिकीकरणासह विविध सहप्रकल्प राबवून हा प्रकल्प प्रदेशातील साखर उद्योगाचा आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.
गळीत हंगामाच्या शुभारंभानिमित्त कारखान्याच्या गव्हाणीचे पूजन कारखान्याचे व्हाइस चेअरमन राजेंद्र कोळपे यांनी सपत्नीक विधिवत पूजन केले. या सोहळ्यास भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, रासाकाचे माजी चेअरमन शंकरराव कोल्हे, दत्तात्रय पाटील डुकरे, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अजिंक्य वाघ, विलासकाका वाघ, सोनेवाडीचे सरपंच सोमनाथ पडोळ, खेड्याचे सरपंच निवृत्ती कोल्हे, रानवडचे सरपंच बाळासाहेब गायकवाड, श्रीरामनगरचे सरपंच भीमराज काळे, नामदेव शिंदे यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक किरण शेलार यांनी केले. सूत्रसंचालन जागृती चकोर यांनी केले तर आभार कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते यांनी मानले. नव्या गळीत हंगामासोबत ‘संजीवनी’ उद्योगसमूहाच्या नेतृत्वाखाली काकासाहेब वाघ साखर कारखान्याची नव्या उभारणीची वाटचाल सुरू झाली असून, या प्रकल्पाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *