शांतीनगरची शांतता धोक्यात; युवकांचा भाईगिरीकडे कल

गेले काही दिवसांपासून मखमलाबाद रोडवरील शांतीनगर परिसरात चेनस्नॅचिंग, हाणामार्‍या, भाईगिरी यामुळे शांतीनगरची शांतता धोक्यात आली आहे.

पंचवटी : सुनील बुनगे

परिसरातील युवक भाईगिरीकडे वळले आहेत. भविष्यात येणार्‍या काळात या भागात टोळीयुद्धाचा भडकादेखील उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता पोलीस यंत्रणेनेदेखील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

पूर्वीचे मखमलाबाद गाव आता एक छोटे महानगरच झाले आहे. दिवसेदिवस या भागाची लोकसंख्या देखील वाढत चालली आहे. गाव सुद्धा आता गाव राहिले नसून गावात देखील जुन्या मोठ्या घराच्या जागांवर इमारती उभ्या राहिल्या आहेत. तर आजही गावात ग्रामविकास मंडळ कार्यरत आहे.
गावातील मंडळी आजूबाजूला विखुरली गेली असून बाहेरून आलेल्या लोकांनी गावचा परिसर गाव ओढला गेला आहे. पूर्वी किमान मोठ्या मंडळींचा आदर्श युक्त दरारा होता. परंतु आजच्या घडीला कोणीही कुणाला जुमानत नसल्याचे चित्र देखील बघायला मिळत आहे. याच मखमलाबाद गावातून अनेक उच्च पदापर्यंत अधिकारी पोहोचले आहेत. गावातील शेकडो युवक पोलीस दलातील शहर आणि ग्रामीण विभागात कार्यरत आहेत. पूर्वीची गावाची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या यात मोठी तफावत झाली आहे. जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून येणार्‍या नोकरदार, व्यवसायांची संख्या लक्षणीय झाली आहे. एकेकाळी शहरातील शांत म्हणून समजले जाणारे मखमलाबाद गावचा परिसर मात्र आता धोक्याची घंटा बनू पहात आहे.
पंचवटी विभागात पूर्वी एकच पंचवटी पोलीस ठाणे होते. परंतु पंचवटी परिसराची लोकसंख्या वाढल्याने आडगाव, म्हसरूळ पोलिस ठाण्यांची निर्मिती झाली. लोकसंख्येच्या तुलनेत तिन्ही पोलिस ठाण्यांमध्ये कर्मचारी संख्या देखील कमी पडत असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे म्हसरूळ, आडगाव परिसर मोठ्या प्रमाणात वाढला गेला आहे. हे गावदेखील महानगर म्हणून अस्तिवात येताना दिसू लागले आहे. मखमलाबाद परिसराच्या हद्दीतील चाणक्यपुरी, स्वामी विवेकानंद नगर याभागात देखील यापूर्वी अनेकदा हाणामार्‍या, गंभीर दुखापत अशा प्रकारचे गुन्हे घडले आहेत. स्वामी विवेकानंद परिसरात अजूनही काही जणांकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला जात असून महिनाभरापूर्वी याच भागात तलवारी काढून हाणामार्‍या करण्याचा प्रकार घडला होता. आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात अनेक युवक गुन्हेगारीकडे वळले आहेत. त्यातच शांतीनगर भागात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी, भाईगिरी वाढली आहे. या भागात भाजीबाजार, चायनिज गाड्या, इतर लहान-मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक दहशतीखाली वावरत आहेत. उगाच वाद नको म्हणून कोणीही तक्रार करण्यासाठी पुढे धजावत नाही. त्यातच भाईगिरी करणार्‍यांकडून आता लहान-मोठ्या व्यावसायिकांकडून तर ‘हप्तावसुली’ सारखे प्रकार घडत आहेत. या व्यावसायिकांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. त्यामुळे एकेकाळी शांत असलेला शांतीनगरचा परिसर आता धोकेदायक बनला आहे. या भागातील शांतता धोक्यात आली आहे.

भाईगिरीकडे वाढला कल

शांतीनगर भागात काही स्थानिक तर बाहेरून आलेले युवक गुन्हेगारीकडे वळताना दिसून येत आहेत. किरकोळ वाद झाले तरी हत्यार काढून हाणामार्‍या तसेच लहान मोठ्या हातगाड्यांवर जाऊन दादागिरी करणे, हप्ता वसुली असे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. दि.3 रोजी एका जणावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याकडून अल्पवयीन युवकावर हल्ला झाल्याची घटना घडली. यात काही गावातील युवक असून शांतीनगर भागातील शंभू,भोलासारख्या इतर भाईंवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

पोलिसांसमोर भाईगिरी मोडीत काढण्याचे आव्हान

पंधरा ते वीस दिवसांपूर्वी नुकताच पदभार घेतलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या समोर आता मखमलाबाद परिसरातील शांती नगर, स्वामी विवेकानंद नगर आदी भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली भाईगिरी मोडीत काढण्याचे आवाहन समोर उभे राहिले आहे. मखमलाबाद गावाचे नाव जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून परिचित आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून नव्याने विकसित झालेल्या कॉलनी परिसरात वाढलेली गुंडगिरी, शाळेच्या परिसरात वावरणारे टवाळखोर यांच्यामुळे हे गांव नेहमी चर्चेत येऊ लागले आहे. त्यामुळे आता नव्याने आलेल्या अधिकार्‍यांना मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भाईगिरीवर ‘अंकुश’ ठेवावा लागणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *