दिंडोरी चौफुलीवर सिग्नल यंत्रणा उभारावी

दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर; संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची गरज

दिंडोरी : प्रतिनिधी
नाशिक-कळवण-दिंडोरी रस्त्यावरील चौफुली परिसरात वाहतूक कोंडी वाहनधारकांसह पादचार्‍यांची डोकेदुखी ठरत आहे. याठिकाणी उड्डाणपूल किंवा बाह्यवळण रस्ता तयार केला, तरीही दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याने सिग्नल यंत्रणा उभारण्यात यावी. शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी मंथन करून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.


दिंडोरी येथील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे. नाशिक ते दिंडोरी हा मुख्य रस्ता असून, या रस्त्यातून अनेक जड वाहने, दुचाकी धावत असतात. मात्र, दिंडोरी येथील चौफुलीवर वाहनांची गर्दीच गर्दी बघावयास मिळते. रस्त्यातच वाहने कोंडली जात असल्याने एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वाहनधारकांना लागतोे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. उड्डाणपूल अथवा पर्यायी रस्ता अगर सिग्नल यंत्रणा उभारण्याचा विचार करावा. दिंडोरीची नाशिक-वणी या महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या बिकट होत आहे. श्री स्वामी समर्थांचे मूळ केंद्र दिंडोरी असल्याने देशभरातील भक्त येथे येतात. त्यात सप्तशृंगगड जवळच असल्याने तेथेही भक्तगण दर्शनासाठी जातात. गुजरातमधील थंड हवेचे ठिकाण सापुतारा येथून जवळच आहे. दिंडोरीचे स्थान हे तसे नाशिक जिल्ह्यात भौगोलिक, आर्थिक, पर्यटन, द्राक्षबागेच्या शेतीबाबत महत्त्वाचे असल्याने दिंडोरीत खर्‍या अर्थाने वाहतुकीची कोंडी होते. पालखेड चौफुलीवर कोंडी झाल्यास सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प होते. त्यानंतर उमराळे चौफुली, जनता इंग्लिश स्कूललगत नेहमी वाहतूक कोंडी होत असते. जनता विद्यालय रस्त्यालगत आहे. या विद्यालयात पाच ते सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी विद्यार्थी रस्त्यावरून जाताना-येताना त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करून घरचा रस्ता धरावा लागत आहे. तरी याचा विचार करून संबंधितांनी वाहतूक कोंडीवर मार्ग काढावा, अशी मागणी आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *