सिन्नरला अतिक्रमणांवर हातोडा; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

मुख्याधिकारी कदम यांची धाडसी कारवाई

सिन्नर : प्रतिनिधी
अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आठवडाभर अगोदर नोटिसा बजावूनही अतिक्रमणधारक भीक घालत नसल्याने मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी मंगळवारी (दि.12) अतिक्रमण निर्मूलनाची धडक मोहीम हाती घेतली. बर्‍याच वर्षांनंतर कुठलाही राजकीय हस्तक्षेप न झाल्याने, शिवाय प्रशासकीय राजवट असल्याने मुख्याधिकार्‍यांनी आपल्या अधिकारात ही कारवाई केल्याने सिन्नरच्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. काही अतिक्रमणधारकांनी राजकीय नेत्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत कारवाई थांबवण्याची विनंती केली. तसेच मुख्याधिकार्‍यांना राजकीय व्यक्तींशी बोलण्याची विनंती केली. मात्र, स्थितप्रज्ञ मुख्याधिकारी कदम यांनी राजकीय व्यक्तींशी बोलणे टाळून आपली कारवाई सुरूच ठेवली. त्यामुळे अतिक्रमणधारकांचा नाइलाज झाला.
दरम्यान, आज बुधवारी (दि.13) दुसर्‍या दिवशीही अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू राहणार आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजेला बसस्थानकाजवळून अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला. महात्मा फुले पुतळ्याच्या चहुबाजूने वसलेले अंडाभुर्जीचे आणि फळगाड्यांचे अतिक्रमण हटवण्यात आले. त्यानंतर बसस्थानक आणि वाजे विद्यालयाच्या मधून जाणारा रस्ता मोकळा करण्यात आला. या रस्त्यावर ओटे बांधून आणि टपर्‍या ठेवून अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू केला होता.
त्यामुळे प्रशस्त रस्त्यावर अवघी 10 फूट जागा शिल्लक होती. नगरपालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवल्यामुळे हा रस्ता पूर्णतः मोकळा झाला. या रस्त्यावर भाजीपाला आणि इतर व्यावसायिकांनी केलेले ओटे जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले.
भैरवनाथ मंदिरासमोरील सर्व टपर्‍या काढून टाकण्यात आल्या. याशिवाय, वडाच्या झाडाला आणि भैरवनाथ मंदिराच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या गेल्या 30 वर्षांपासूनच्या टपर्‍या काढून टाकल्या. अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू झाल्यामुळे व्यावसायिकांची धावपळ झाली. बहुतेकांनी आपल्यापर्यंत मोहीम येण्याच्यापूर्वीच टपर्‍या खोलून आपापल्या सोयीने वाहनात टाकून रवाना केल्या.
खासदार पूल, नवापूल, भाजीपाला बाजार या सर्वच ठिकाणची अतिक्रमणे उद्ध्वस्त करण्यात आली. नाशिक वेशीला लागून असलेल्या देव नदीकाठच्या मांस – मच्छी विक्रेत्यांनीही आपले स्टॉल
स्वतःहून काढले.

 

पोलीस, रुग्णवाहिका घटनास्थळी सज्ज

दोन जेसीबी, तीन ट्रॅक्टर सज्ज ठेवण्यात आले होते. पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांच्यासह 4 महिला आणि 11 पुरुष पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिका, महावितरणचे 8 कर्मचारी आणि नगरपालिकेचा संपूर्ण स्टाफ अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत सहभागी झाला होता.

या भागातील अतिक्रमणे उद्ध्वस्त

महात्मा फुले पुतळा, वाजे विद्यालयाच्या जवळून जाणारा रस्ता, नवा पूल, खासदार पूल, भैरवनाथ मंदिर, भाजी बाजार, नाशिक वेस, देवनदी काठावरील मांस – मच्छी बाजार आदी परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. अतिक्रमण निघाल्याने या परिसरातील रस्ते प्रशस्त झाले आहेत.

कारवाईचे सिन्नरकरांकडून स्वागत

गेल्या 12-15 वर्षांत एकही मुख्याधिकार्‍याने अतिक्रमण काढण्याचे धाडस केले नव्हते. तात्पुरत्या स्वरूपात जुजबी कारवाई करून त्यावरच हे अधिकारी समाधान मानत. मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी नोटिसा बजावून, अतिक्रमणधारकांशी चर्चा करून, वर्तमानपत्रात जाहिरात देऊन अतिक्रमणे स्वतःहून काढण्यासंदर्भात व्यावसायिकांना विनंती केली होती. मात्र, विक्रेत्यांनी अतिक्रमणे न काढल्याने त्यांनी धाडसी निर्णय घेत तत्काळ अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतली. त्यामुळे रस्त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा झाला. सिन्नरकरांनी त्यांच्या या कारवाईचे आणि धाडसाचेही कौतुक केले.

कारवाईत सातत्य ठेवणार

वाहतुकीस अडथळे ठरणार्‍या शहरातील सर्व रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. मोहीम पूर्ण झाल्यावरही अतिक्रमण विभागाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून कारवाईत सातत्य ठेवले जाईल. भाजीपाला व्यावसायिक आणि फळविक्रेते यांचे नुकसान होऊ देणार नाही. त्यासाठी स्वतंत्र हॉकर्स झोन तयार केले जातील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *