तीन तासांत 144 मिमी ढगफुटीसदृश पाऊस
सिन्नर ः प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात काल (दि.25) दुपारी चारच्या सुमारास ढगफुटीसदृश पावसाने धुमाकूळ घातला. सिन्नर बसस्थानकाचा गॅलरीचा स्लॅब पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे निखळून नाशिकच्या फलाटवर उभ्या असलेल्या शिर्डी-ठाणे शिवशाही बसवर पडला. यावेळी बसस्थानकात 250 ते 300 प्रवाशी होते, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.
तालुक्याचे आमदार तथा राज्याचे कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सन 2012-2014 याकाळात बीओटी तत्वावर अत्याधुनिक बसस्थानकाची उभारणी करण्यात आली होती. आकर्षक डिझाईन, रचना आणि सोयीसुविधांमुळे हे बसस्थानक राज्यभरात लौकिकप्राप्त झाले होते. राज्यातील मोठ-मोठे नेते, मंत्री यांनी बसस्थानकाला भेटी देऊन कौतुक केले होते. या बसस्थानकात बसेस उभ्या राहतात त्या ठिकाणी 100 बाय 10 फुटाचा गॅलरीचा स्लॅब असून हा स्लॅब निमुळता आहे. वादळी वार्यासह झालेल्या पावसाच्या पाण्याचा जोर खूपच असल्याने हा स्लॅब निखळला. यावेळी बसस्थानकातील नाशिककडे जाणार्या फलाटवर शिर्डी-ठाणे ही शिवशाही बस (क्र. एमएच-09, ईएम-3575)व बाजूलाच एक कार (क्र. एमएच-03, एडब्ल्यू-4348) उभी होती. या दोन्ही वाहनांवर हा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळत असल्याचा अंदाज येताच शिवशाही बसमधील प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. या घटनेत शिवशाही बससह कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर कारचालक किरकोळ जखमी झाल्याचे समजते.
दरम्यान, घटनेनंतर आगार व्यवस्थापनाने सिन्नर नगरपरिषद व पोलिसांना माहिती दिल्यानंतर नगरपरिषदेचे अग्नीशामक विभागाचे कर्मचारी तसेच पोलिस कर्मचार्यांनी बसस्थानकात धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. जेसीबीच्या सहाय्याने स्लॅबचा कोसळलेला भाग बाजूला करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी भोसले, कल्याणी ढगे, विभाग नियंत्रक सोनवणे, आगारप्रमुख हेमंत नेरकर, स्थानक प्रमुख सुरेश पवार, वाहतूक निरीक्षक भरत शेळके, आण्णा पवार, कर्मचारी देवा सांगळे तसेच सिन्नर नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह आग्नीशामक विभागाचे लाला वाल्मिकी, नवनाथ जोंधळे, प्रकाश घेगडमल, अल्ताफ शेख,ताहीर शेख, आकाश देवकर, सागर डावरे यांच्यासह कर्मचार्यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. दरम्यान, या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले, काही भागात घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. काही भागात झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या तर काही झाडे देखील उन्मळुन पडल्याचे समजते.