पारंपरिक पाळणा गात शिवरायांना मानाचा मुजरा
शिवनेरी :
स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ला येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही उपस्थित राहून अभिवादन केले. शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करत, नतमस्तक होऊन कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. शिवरायांनी उभारलेले स्वराज्य, न्यायनिष्ठा, शौर्य आणि सर्वधर्मसमभावाची शिकवण आजही राज्यकारभारासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद
केले.
शिवनेरी किल्ल्याचा परिसर यानिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. पारंपरिक पोशाखातील महिला-पुरुष, मावळ्यांच्या वेशात तरुण, तसेच लहानग्यांच्या शिवाजी महाराजांच्या वेशभूषेने संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या मंगलमयी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून हजारो शिवभक्त गडावर दाखल झाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले स्वराज्य आजही सुशासनाची प्रेरणा देते. शिवरायांच्या विचारांवर चालत बलशाली व स्वाभिमानी महाराष्ट्र घडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महाराजांनी
जलव्यवस्था, अर्थकारण व पर्यावरण रक्षणाच्या संकल्पना चारशे वर्षांपूर्वीच राबवल्या. ‘शिवराई’ ही चलन व्यवस्था त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन अधिक वेगाने करण्यात येईल. बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त किल्ले स्वच्छता व जतन मोहीम राबविण्यात येणार आहे.
जुन्नर तालुका व शिवनेरी किल्ला परिसराच्या विकासाला प्राधान्य देऊन प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री शिंदे
म्हणाले.
विचारांचा वारसा सोडणार नाही : सुनेत्रा पवार
शिवनेरी : राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेला सुखी-समाधानी ठेव, छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालायचं बळ आम्हा सर्वांना दे, असं साकडं मी आई शिवाई देवीच्या चरणी घालते. यापूर्वी अनेकदा शिवछत्रपती महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांना वंदन करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं. पण आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करुन देणारा आहे. मी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ज्या कठीण प्रसंगात मी शपथ घेतली, त्यावेळी माझ्या डोळ्यांसमोर जिजाऊ माँसाहेब उभ्या होत्या. जिजाऊ माँसाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, त्यांना स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द दिली. तीच तुमची आमची प्रेरणा आणि आधार आहे. शिवरायांच्या जन्मभूमीवर आज बोलताना माझ्या अंगावर काटा आला आहे. छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिलेली स्वराज्याची शपथ आठवली. आपण सगळेजण शिवरायांचे मावळे आहोत, हीच भावना आज माझ्या मनात आहे. ज्या विचारांवर आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तोच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही, हा शब्द मी या पवित्र भूमीवर शिवजयंतीच्या दिवशी मी तुम्हाला देते.असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.
अजितदादांचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम : फडणवीस
अजितदादांचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं, मागच्या काळात आम्ही घोषणा केली होती की, महाराष्ट्रातील शिवरायांचे सर्व किल्ले आम्ही अतिक्रमणमुक्त करू. मला सांगताना आनंद वाटतोय की, पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले आता अतिक्रमणमुक्त झाले आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा 396 वा जन्मोत्सव सोहळा शिवनेरी येथे पार पडला. या कार्यक्रमातून ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भारताचा भूगोल यापैकी काही राहिले नसते. अजितदादांच्या इच्छेनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले आता अतिक्रमणमुक्त झाले आहेत. एकाही किल्ल्यावर आता अतिक्रमण नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच 2030 ला 400 वी शिवजयंती आपण भव्य दिव्य स्वरूपात साजरी करू, असेदेखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Spectacular ceremony at Shivneri Fort