घोटीतील श्रीरामवाडीतील धक्कादायक घटना; टवाळखोरांवर गुन्हा
इगतपुरी : प्रतिनिधी
घोटी शहरातील श्रीरामवाडी परिसरात ‘माझ्याशी बोलत का नाही’ असा जाब विचारत एका टवाळखोराने दहावीतील विद्यार्थिनीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सचिन वसंत चव्हाण (वय 48, रा. आरोटेनगर) यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी ही घोटी शहरातील जनता विद्यालयात दहावीमध्ये शिक्षण घेत असून, ती दररोज घरापासून शाळेत पायी जात असते. सुमारे एक वर्षापासून गौरव उर्फ दक्ष भास्कर चौधरी (रा. मार्केट कमिटीमागे, इंदिरानगर, घोटी) हा माझ्या मुलीचा पाठलाग करून ‘माझ्याशी बोल’ अशी जबरदस्ती करत असल्याची तक्रार कुटुंबीयांनी यापूर्वी शाळेत दिली होती. त्यावेळी शाळा प्रशासनाने संबंधित मुलाला समज दिली होती. मात्र, त्यानंतरही त्याचा त्रास सुरूच असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान,
4 मार्च रोजी विद्यार्थिनीचा दहावीचा हिंदी विषयाचा पेपर होता. पेपर संपल्यानंतर ती मैत्रिणीसह दुपारी सुमारे 2.45 वाजता श्रीरामवाडी पुलाजवळून घरी परतत असताना आरोपी दक्ष चौधरी त्यांच्या मागे आला. त्याने ‘आजचा पेपर कसा झाला?’ असे विचारत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थिनीने दुर्लक्ष करून पुढे निघून गेल्यावर आरोपीने संतापाच्या भरात त्याने हातातील लोखंडी रॉडसारख्या वस्तूने विद्यार्थिनीच्या डोक्याच्या मागील बाजूस वार केला व तेथून नाशिक महामार्गाच्या दिशेने पळ काढल्याचे मैत्रिणीने कुटुंबीयांना सांगितले. या हल्ल्यात विद्यार्थिनी जखमी झाली असून, तिला प्रथम घोटी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी तिला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे घोटी शहरात संताप व्यक्त केला जात असून, अशा प्रकारांवर तात्काळ आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, घोटी पोलीस ठाण्यात आरोपी गौरव उर्फ दक्ष भास्कर चौधरी याच्याविरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, घोटी शहरात अलीकडच्या काळात मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. त्यामुळे “कुठे गेला कायद्याचा बालेकिल्ला?” असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी टोलनाक्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेत पोलिसांनी दोन युवकांची धिंड काढली होती. मात्र, येथे एका विद्यार्थिनीवर थेट लोखंडी रॉडने हल्ला झाल्यानंतरही आरोपीवर कठोर कारवाई होईल का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
टवाळखोरांवर कठोर कारवाई करा
काही दिवसांपूर्वी बलायदुरी येथील माजी सरपंचांनी परिसरातील काही टवाळखोरांना मुलींची छेड काढू नका, असा जाब विचारला असता, त्यांनाही मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे घोटी शहरात टवाळखोरांचा वाढता उपद्रव चिंतेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, जनता विद्यालय परिसर, आदर्श कन्या विद्यालय, ज्युनिअर कॉलेज, घोटी बसस्टॉप तसेच मुलींच्या शाळेत ये-जा करण्याच्या रस्त्यावर अनेकदा टवाळखोरांची गर्दी होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत काही युवक रस्त्यावर उभे राहून मुलींना त्रास देत असल्याचेही नागरिक सांगतात. त्यामुळे या भागात पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी व टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.
Student attacked with rod for not talking to me