शहा येथे शाळकरी मुलीची आत्महत्या; टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

शहा येथे शाळकरी मुलीची आत्महत्या
टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीत तिघांचा उल्लेख, गुन्हा दाखल
वावी/शहा ः वार्ताहर
सिन्नर तालुक्यातील शहा येथे श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकणार्‍या 16 वर्षीय मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.22) मध्यरात्री एकच्या सुमारास उघडकीस आला.वैष्णवी नवनाथ जाधव असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.
मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गावातील तीन टवाळखोर तरुणांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून वावी पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी शाळेच्या परिसरात टवाळखोरी करत मुलींना त्रास देणार्‍या गावातील तिघांसोबत तिचा वाद झाला होता. या तिघा तरुणांनी घरी येत तिचे वडील नवनाथ जाधव यांना तिच्याबद्दल वाईट साईट सांगून त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की देखील केली होती. गावातील काही ग्रामस्थांनी हे भांडण सोडवत त्या मुलांना समज देऊन जायला सांगितले होते. मात्र हे तीनही मुले गुंड प्रवृत्तीची असल्यामुळे व शाळेच्या परिसरात मुलींची छेडछाड करणे, त्यांना त्रास देणे असे प्रकार नेहमीच करत असल्यामुळे ते आपल्याला व कुटुंबीयांना पुन्हा त्रास देतील या भीतीने घाबरलेल्या वैष्णवीने सोमवारी रात्री घरातील सर्वजण झोपी गेल्यानंतर छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
शाळेच्या गणवेशातील लेगीज पॅन्ट फाडून तिने दोरी बनवली व घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री तिचे चुलते जालिंदर हे एमआयडीसीतून कामावरून घरी परतल्यावर लक्षात आला. वैष्णवी, तिचा लहान भाऊ योगेश व चुलता घराच्या बैठक खोलीत झोपायचे. तर आई वडील बाजूच्या खोलीत झोपायचे. भाऊ योगेश हा पिठाच्या गिरणीत उशीर झाल्याने तेथेच थांबला होता. वैष्णवी खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने जालिंदरने नवनाथ व वहिनी सुनीता यांना उठवले. या सर्वांनी दरवाजा उघडण्यासाठी वैष्णवीला आवाज दिला. मात्र प्रतिसाद येत नसल्याने जालिंदरने पहारीच्या सहाय्याने दरवाजा तोडला. यावेळी वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. गावातील स्थानिक डॉ. नीलेश शिरसाठ यांनी तपासून वैष्णवी मृत झाल्याचे सांगितले.
त्यानंतर जाधव कुटुंबीयांनी आपले नातलग व मित्र परिवाराला याबद्दल माहिती दिली. नातेवाइकांनी वावी पोलीस ठाण्यात कळवत मृतदेह दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवला. वैष्णवीने आत्महत्या केली त्या खोलीत वहीच्या कागदावर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात तिने गावातीलच वैभव विलास गोराणे, अंकुश शिवाजी धुळसुंदर व आणखी एका अल्पवयीन मुलाच्या नावाचा उल्लेख केला आहे. हे तिघेजण आपल्याला नेहमीच त्रास देत होते. माझ्यासह शाळेतील अनेक मुलींना त्यांनी त्रास दिला आहे. मी विरोध केला म्हणून त्यांनी घरी येवून वडिलांना माझ्याबद्दल वाईट साईट सांगितले. शिवीगाळ करून धक्काबुक्की देखील केली. ते तिघेही वाईट प्रवृत्तीचे असून पुन्हा त्रास देतील व पुन्हा काही झाल्यास घरी वडील मारतील. या भीतीने मी आत्महत्या करत आहे, असा उल्लेख या चिठ्ठीत होता.
दरम्यान, या प्रकाराची माहिती समजल्यावर रात्री वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे आपल्या सहकार्‍यांसमवेत शहा येथे जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. वैष्णवीच्या कुटुंबियांकडून मिळालेली माहिती व तिने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी या आधारे पोलिसांनी रात्रीच तिघा संशयित तरुणांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी एक जण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी सकाळी दोडी येथील रुग्णालयात शहा गावातील ग्रामस्थ व तरुणांनी मोठी गर्दी केली होती. लोखंडे हे स्वतः शवविच्छेदन कक्षात थांबून होते. चिठ्ठीत उल्लेख असलेल्या संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यावरच अंत्यसंस्कार केले जातील अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. दुपारी साडेतीन वाजता वैष्णवीच्या वडिलानी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी वैभव गोराणे, अंकुश धुळसुंदर व एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. तोपर्यंत मृतदेह असलेली रुग्णवाहिका पोलीस ठाण्याच्या आवारात थांबून होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात शहा येथे सायंकाळी वैष्णवी जेवण अंत्यसंस्कार करण्यात आले.
वैष्णवीच्या आत्महत्येने टवाळखोरांचा प्रश्‍न ऐरणीवर
आत्महत्या करण्यापूर्वी वैष्णवीने तिला गावातील टवाळखोरांकडून होणारा त्रास कथन केला आहे. कमी अधिक प्रमाणात प्रत्येक ठिकाणी शाळकरी मुलीला हा त्रास सहन करावा लागतो. तिने विरोध केला म्हणून या टवाळखोरांची थेट तिच्या वडिलांवर हात उचलण्यापर्यंत मजल गेली. वैष्णवी शिकत होती त्या शाळेत अनेक मुली या त्रासाला सामोरे जात असल्याचे चिठ्ठीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. शाळेच्या परिसरात व गावभर मुलींची छेडछाड करणार्‍या टवाळांचा हा उच्छाद थांबवला नाहीतर गावात आणखी प्रकार घडतच राहतील आणि एखाद्या वैष्णवीला जीव द्यावा लागेल, है प्रतिनिधीक गार्‍हाणे या चिठ्ठीत मांडण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *