सुनीत पोतनीसांकडून बावनकशी सोन्यासारखी साहित्याची निर्मिती

गिरीश टकले : ‘शोध बदलत्या पृथ्वीचा’ पुस्तक प्रकाशन सोहळा

नाशिक : प्रतिनिधी
सुनीत पोतनीस यांनी उशिराने लेखनाला सुरुवात केली, पण बावनकशी सोन्यासारखी साहित्याची निर्मिती केली, असेे प्रतिपादन राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी केले. सुनीत पोतनीस लिखित ’शोध बदलत्या पृथ्वीचा’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि. 15) गिरीश टकले व राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे यांच्या हस्ते शंकराचार्य न्यास कुर्तकोटी सभागृह येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. बोरसे पुढे म्हणाले, की गांवकरी म्हणजे गुरुकुल. या गुरुकुलाचे प्रमुख दादासाहेब पोतनीस यांच्या मार्गदर्शनात, सान्निध्यात अनेक चांगले लोक तयार झाले. भूगोल समजल्याशिवाय इतिहास समजत नाही. शास्त्रीय विषयावरचे लेखन अवघड अन् बोजड ठरण्याची शक्यता असते. मात्र, दंतकथांची चांगल्यारीतीने जोड देऊन पुस्तक वाचनीय केले आहे. चिकित्सक व वैज्ञानिक पद्धतीने 4,500 हजार वषार्ंत पृथ्वीत झालेल्या बदलांचा धांडोळा घेतला आहे. पोतनीस यांनी पुस्तकात सहज, सुंदर, अत्यंत सुबोध, रसाळ शैलीत पुस्तक लिहिले आहे. पोतनीस हा हुद्दा आहे. पूर्वी तिजोरीच्या राखणदारास पोतनीस म्हटले जात होते. सुनीत पोतनीस यांनीही आपल्या बुद्धिमत्तेचे, अभ्यासाचे, अनुभवाचे संकलन करत पुस्तकरूपी तिजोरी वाचकांसाठी खुली केली आहे.
यावेळी अनंत येवलेकर व वंदना अत्रे यांनी सुनीत पोतनीस यांची छोटेखानी मुलाखत घेतली. या मुलाखतीत पुस्तक लिहिण्यामागचा प्रवास उलगडतानाच पृथ्वीच्या निर्मितीवेळी, निर्मितीनंतर भूगर्भात झालेले प्रमुख बदल आणि त्यासंदर्भातील माहिती उलगडून सांगितली. सुनीत पोतनीस म्हणाले, की ’बखर संस्थांची’ व ’जे आले ते रमले’ या दोन्ही पुस्तकांच्या निर्मितीआधी दैनिकात सदर सुरू होते, नंतर त्यांचे पुस्तकात रूपांतर करण्यात आले. ’शोध बदलत्या पृथ्वीचा’ हा निराळा विषय आहे. कन्याकुमारीत विवेकानंद स्मारकाच्या तिथे असलेला खडक व बंगलोरला लालबागच्या मागे असलेल्या टेकड्या याविषयी अद्भुत माहिती मिळाली. पृथ्वीची निर्मितीनंतर साडेचार वर्षांपूवी बेन्झिया हा एकच खंड होता. पृथ्वीच्या निर्मितीच्यामध्ये पहिल्यांदाच जे खडक निर्माण झाले ती पहिली टेकडी लालबागची आहे. माहिती वाचत गेलो, शोधत गेलो. भूगर्भशास्त्राची माहिती मिळाली म्हणून पुस्तक काढू असं ठरवलं. असे मुलाखतीत सुनीत पोतनीस यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुनीत पोतनीस यांच्या कन्या प्राची पोतनीस-देवस्थळी यांनी मनोगत व्यक्त केले. रवींद्र देवरे व विकास गोगटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. वंदना अत्रे यांनी सूत्रसंचालन केले. अनंत येवलेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *