पुरवठा निरीक्षक गायकवाड : तीन महिन्यांचा शिधा एकाचवेळी देण्याबाबत संभ्रम
निफाड : विशेष प्रतिनिधी
पावसाळ्याच्या संभाव्य प्रतिकूल हवामानाचा विचार करता शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत प्रत्येक जिल्ह्यात जून, जुलै व ऑगस्ट 2025 या तीन महिन्यांचा शिधा एकाचवेळी देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून लाभ घेणार्या पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. मात्र, याबाबत कोणतेही आदेश शासनस्तरावरून आले नाहीत, असे पुरवठा निरीक्षक अतुल गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
पुरवठा विभागाकडून या अन्नधान्याची आगाऊ उचल करण्यात येणार असून, वाटपाची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत निश्चित केली आहे. दरम्यान, या तीन महिन्यांचे व्यवहार व प्रमाणीकरण हे स्वतंत्रपणे करण्याचे स्पष्ट निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. शिधावाटपाची प्रक्रिया 1 जून 2025 पासून सुरू होणार
आहे.
सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपापल्या भागातील रास्तभाव दुकानात जाऊन ई-पॉस मशिनवर अंगठा (थम्ब) देऊन तीनही महिन्यांचा शिधा एकाचवेळी उचलावा, असे आवाहन शासन करीत आहे. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान पूरस्थिती, रस्ते बंद, वीज खंडित यांसारख्या अडचणींमुळे धान्य वितरणात अडथळा येणार नाही. आगामी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता प्रत्येक जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात येणार आहे. नागरिकांनी सर्व बाबींची पूर्तता करून धान्याची उचल करावी, असे सांगण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी शिधापत्रिकांची पूर्तता करून ठेवणे आवश्यक आहे. अन्नधान्य उचलताना ओळखपत्र, शिधापत्रिका व मोबाईल क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे. अनेक जिल्ह्यांत दरवर्षी पावसाळ्यात अनेक गावांमध्ये वाहतुकीचे व संपर्काचे प्रश्न निर्माण होतात. अशा परिस्थितीत शिधा आगावू मिळाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, पुरवठा विभाग व रास्तभाव दुकानदार यांच्यात समन्वय ठेवून हे वाटप वेळेत पूर्ण करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तीन महिन्याचा शिधा एकत्र देण्याचे धोरण शासनाचे असले तरी आपल्याकडे अन्नधान्याचा पुरवठा करताना एक-एक महिन्यात करण्यात येतो. आगाऊ अन्नधान्याचा कोठा उचलण्यासंदर्भात कोणतेही आदेश अद्याप तरी नाही. कदाचित ज्या भागात पावसामुळे जनसंपर्क तुटला जातो, अशा भागात तीन महिन्यांचा एकत्र शिधा देण्याचा शासनाचा मानस असावा. आपल्याकडे रस्ते व दळणवळणाच्या सोयी उपलब्ध आहे. शासनाचे आदेश आल्यास त्याचे पालन केले जाईल व संबंंधित घटकांना त्याची माहिती दिली जाईल.
– अतुल गायकवाड, पुरवठा निरीक्षक, निफाड