नाशिक :प्रतिनिधी
मराठी भाषेचा कमी होणारा वापर हे मराठी संस्कृती नष्ट होण्याचे ध्योतक मानले तर वावगे ठरणार नाही. मात्र मराठी संस्कृती टिकण्यासाठी मराठी भाषेचा वापर वाढवणे गरजेचे आहे. पण दिवसेंदिवस मराठी शाळांची संख्या कमी होत आहे. आणि ज्या मराठी शाळा आहेत त्यांना विद्यार्थी मिळेनात अशी बिकट अवस्था झाली आहे. मात्र या गोष्टीला जसे सरकारचे धोरण जबाबदार आहे त्याचप्रमाणे पालकांची मानसिकता ही जबाबदार आहे. मराठी माध्यमात शिक्षण झाले तर आपल्या पाल्याची प्रगती होणार नाही अथवा त्याचे भवितव्य अंधारात जाईल असे गृहित धरून पालक ऐपत नसतानाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. त्यामुळे मराठी शाळांना विद्यार्थी मिळत नाहीत. मात्र यासाठी सरकारने मराठी शाळा टिकाव्यात यासाठी ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा गुणवत्ता या विषयी लोकांच्या मनातील कमी होत असलेली विश्वासार्हता दूर करणे आवश्यक आहे.
मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणे म्हणजे इंग्रजीपासून दुर जाणे नाही तर मराठी आत्मसाद करणे आहे हेही पालकांनी समजून घ्यायला हवे. इंग्रजीतून पाल्याचा व्यक्तिमत्व विकास होत असला तरी मानसिक विकास अथवा वैचारिक पातळी वाढवण्यासाठी मातृभाषेचीच आवश्यकता असते. मुलांना मराठीची गोडी लागण्यासाठी पालकांनी आपल्या मानसिकतेत बदल करत इंग्रजी बरोबर मराठी भाषा शिकवण्यास प्राधान्य द्यावे असे झाले तरच मराठी भाषा रुजेल टिकेल .