कपाशी, सोयाबीन पेर्यात घट; टोमॅटो लागवडीतही वाढ, रोपांची बुकिंग
येवला, नाशिक : प्रतिनिधी
अद्याप मॉन्सूनचे आगमन झाले नसतानाच पेरणीची लगबग सुरू आहे. यंदा तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रात मका पीक घेतले जाणार असून, कपाशी हद्दपार होण्याची, तर सोयाबीन, बाजरीत मोठी घट होण्याची चिन्हे दिसत आहे. हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून मका अन् भावात कितीही चढ-उतार झाले तरी परवडणारे पीक असल्याने कांद्याकडे यंदा शेतकर्यांचा कल आहे.
यंदा चांगल्या पावसाचे भविष्य वर्तविले असून, गेल्या आठवडाभरात पावसाने दमदार सलामी दिल्याने शेतकर्यांना खरिपासाठी शुभसंकेत मिळाल्याचे दिसते. अर्थात, हा मॉन्सूनपूर्व पाऊस असल्याने हंगाम मॉन्सूनच्या आगमनाचे वेध लागले आहे. मशागतीलायक पाऊस झाल्याने पूर्व भागात पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मकाची मोठ्या क्षेत्रावर पेरणी होणार आहे. पावसाने उघडीप देताच पेरणीने वेग घेतला आहे. तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र मका व लाल कांद्याखाली गुंतविले जाणार आहे. यंदाही मकाचा भाव 2200 ते 2400 वर गेल्याने शेतकर्यांचा कल मका पिकाकडे आहे. जोडीलाच कांद्याच्या दरातही तेजी असल्याने अन् लाल कांद्याला भाव मिळतोच म्हणून त्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
लाल कांदा पोळ्याच्या दरम्यान लागवड होत असल्याने त्या क्षेत्रात मुगाचे पीक घेऊन कांदा लागवड करण्यासाठी आत्ताच मुगाची पेरणी सुरू झाली आहे. तालुक्यात मकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, जिल्ह्यात नंबर एकवर मका घेतली जाणार आहे.
कपाशी व सोयाबीन पिकाच्या दरात सातत्याने घट होत असल्याने यंदा कपाशीचे पीक हद्दपार होण्याची भीती आहे, तर सोयाबीनसह कडधान्य, तेलबिया व बाजरीच्या क्षेत्रात यंदाही घट होणार आहे. तालुक्यातील शेतकरी नगदी भाजीपाल्याकडे वळत आहेत. मागील वर्षी तालुक्यात टोमॅटोच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झाली होती. मात्र, सुरुवातीला मिळणार्या भावामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड झाली असून, शेतकर्यांनी रोपे बुक केली आहे. मागील दोन-तीन वर्षी लाल कांद्याला तेजी राहिल्याने यंदा शेतकरी लाल कांदे लागवडीला प्राधान्य देणार असल्याचे दिसतेे.
यंदा 75 हजार हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट
तालुक्यात खरिपाचे पूर्वी सर्वसाधारण क्षेत्र 54 हजार 233 हेक्टरवर होते. मागील काही वर्षांत त्यात वाढ होऊन 70 हजार 111 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, 75 हजार 170 हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामालायक पाऊस झाल्याने पेरणीची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यात मका, मूग, सोयाबीन, कापूस, भुईमूग, तूर, उडीद आदी पिकांची खरीप हंगामात पेरणी होणे अपेक्षित आहे.
मॉन्सूनपूर्व चांगला पाऊस झाला असला तरी अजून मॉन्सूनचे आगमन झालेले नाही. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये. मॉन्सून आल्यावर पेरणी केलेली योग्य राहील. मकाच्या क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, मुगाची पेरणी वाढेल. कपाशी, सोयाबीनच्या क्षेत्रात घट होताना दिसेल. पेरणी व खरिपाबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा.
-शुभम बेरड, तालुका कृषी अधिकारी, येवला