‘महाजन फॅक्टर’ ठरला निर्णायक

उत्तर महाराष्ट्राचे खरे नायक; स्वपक्षीय विरोध, बाह्य आव्हाने फोल

नाशिक ः प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 122 पैकी तब्बल 72 जागा जिंकत ऐतिहासिक विजय नोंदवला असून, या विजयामागे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे खंबीर नेतृत्व, अचूक राजकीय गणित आणि चाणक्यनीती निर्णायक ठरली आहे. या विजयावर महापौरपदी भाजपच्या हिमगौरी बाळासाहेब आहेर-आडके यांच्या निवडीने शिक्कामोर्तब झाले असून, निवडणुकीच्या निमित्ताने गिरीश महाजन हेच नाशिकचे खरे पालक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीपूर्वी भाजपला पूर्ण बहुमत मिळेल, अशी शक्यता फारशी व्यक्त केली जात नव्हती. कारण भाजप-शिवसेना युती न होता, ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली गेली होती. एकीकडे शिंदे गट व अजित पवार गट यांनी स्वतंत्र ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये संयुक्त सभा घेत वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाशिकमध्ये जोरदार प्रचार करत सर्व बाजूंनी भाजपसाठी आव्हान उभे केले होते.
इतकेच नव्हे, तर भाजपमध्येही अंतर्गत राजकारणाचा फटका बसतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती. तिकीट वाटपावरून निर्माण झालेला गोंधळ, काही अधिकृत उमेदवारांना पक्षचिन्ह न मिळणे, स्थानिक लोकप्रतिनिधींची संशयास्पद भूमिका, तसेच तपोवन वृक्षतोड प्रकरणाच्या आडून मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी करण्याचे प्रयत्न हे सारे अडथळे भाजपसमोर उभे ठाकले होते. विशेष म्हणजे, या गोंधळात स्वपक्षीयांनीच आघाडी घेतल्याचे चित्र पुढे आले. पक्षांतर्गत मतभेद, महिला आमदारांमधील नाराजी, नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांच्या प्रवेशाला झालेला विरोध या सार्‍या कारणांमुळे भाजपला जेमतेम 40 ते 50 जागाच मिळतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. इतकेच नव्हे, तर महापालिकेत भाजपची सत्ता येऊ नये, यासाठी काही स्वकीयांनीच अप्रत्यक्ष भूमिका घेतल्याचे आता उघड झाले आहे. आणि मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत पक्षाविरुद्ध भूमिका घेतली आता हे यानिमित्ताने उघड झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही मंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीवर मात करत भाजपला तब्बल 72 नगरसेवक निवडून आणून दिले. हा विजय सहज शक्य नव्हता. पक्षांतर्गत विरोध, बाह्य राजकीय आव्हाने आणि नकारात्मक वातावरण या सगळ्यांवर मात करत किल्ला लढवत महाजनांनी आपली चाणक्यनीती पुन्हा एकदा सिद्ध केली. जर स्वपक्षीयांनी पक्षाविरोधी भूमिका घेतली नसती तर हा आकडा निश्चितच 100 च्या आसपास गेला असता, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
नाशिकसोबतच जळगाव व धुळ्यातही मंत्री महाजनांच्या नेतृत्वाखाली भाजपने एकहाती सत्ता मिळवली. जळगावमध्ये त्यांच्या शिलेदारांनी 100 टक्के जागांवर यश मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला, तर धुळ्यातही भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
येणार्‍या कुंभमेळ्याचा विचार करता नाशिककरांनी विकास, नियोजन आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत मंत्री गिरीश महाजन यांच्या पारड्यात मतदानाचे भरघोस दान दिले. या निवडणुकीतून उत्तर महाराष्ट्रात भाजपचे खरे नायक आणि संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.
एकंदर राजकीय समीकरणे पाहता, कठीण परिस्थितीत पक्षाला सावरणारे, योग्य निर्णय घेणारे आणि विजयाकडे नेणारे नेते म्हणून मंत्री गिरीश महाजन यांचा करिष्मा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. पक्षातील त्यांचे वजन अधिक घट्ट झाले असून, उत्तर महाराष्ट्रात पुढील काळातही ‘महाजनांचेच राज्य’ राहणार, यात आता शंका उरलेली नाही.

गेल्या दीड-दोन महिन्यांपासून मंत्री गिरीश महाजन स्वतः नाशिकमध्ये ठाण मांडून होते. प्रत्येक प्रभागातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत, विश्वासू शिलेदारांमार्फत अचूक निवडणूक व्यवस्थापन राबवले गेले. आमदार राहुल ढिकले यांनीदेखील सर्व ताकद पणाला लावून काम केले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने महाजन यांनी सर्वच धोके लक्षात घेता समाजातील विविध घटकांना एकत्र बांधण्याची मोट उभी केली, तर पक्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या उमेदवारांचा योग्य वापर करत भाजपचा विस्तार केला. त्याचा फायदा झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे व सर्व प्रवेशित उमेदवारांचा विजय झाला आहे हेदेखील अधोरेखित झाले आहे.

The ‘Mahajan Factor’ proved decisive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *