पोलिसांनी आता दंडुका उगारण्याची गरज

रिक्षाचालकांच्या मुजोरीचे व्हिडीओ व्हायरल

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील भाई, अण्णा, बॉस यांची दहशत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोडीत काढत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला बनविल्याने संपूर्ण नाशिककर नागरिकांकडून पोलिस आयुक्त आणि पोलिसांचे कौतुक होत आहे. पोलिसांनी ही मोहीम कायम ठेवावी. अशी अपेक्षा नाशिककर नागरिक व्यक्त करीत आहेत. एकीकडे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविले जात असतानाच शहरातील रिक्षाचालकांमुळे बिघडलेल्या वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच सोशल मीडियावर रिक्षाचालकांच्या मुजोरीचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे या रिक्षाचालकांनाही एकदा पोलिस आयुक्तांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. हे दाखवून देण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.
शहरातील रविवार कारंजा, शालिमार, नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसर, अशोक स्तंभ, सीबीएस, ठक्कर बसस्थानक, त्र्यंबक नाका या भागातील रिक्षाचालकांकडून सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यातही रविवार कारंजा येथे भररस्त्यात रिक्षा लावण्याबरोबरच वन-वेचे नियम मोडणार्‍या रिक्षाचालकांमुळे रविवार कारंजा परिसरातून वाहने चालविणे तर दूरच, परंतु पायी चालणेही अवघड झाले आहे. रविवार कारंजावर पूर्णपणे रिक्षाचालकांनी अतिक्रमण केले आहे. वाहतूक पोलिसांसमोरच रिक्षाचालक मोठी दादागिरी करतात. इतर वाहनधारकांच्या अंगावर धावून जातात. काल रविवारी एका महिलेला कट मारून पुन्हा या महिलेलाच मारहाण करणार्‍या रिक्षाचालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्र्यंबक नाका येथील सिव्हिलसमोर एका प्रवाशाला नशेत असलेला रिक्षाचालक काठीने मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ देखील विविध सोशल माध्यमांवर झळकला. दोनच दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथे जाणार्‍या प्रवाशांना लुटणार्‍या रिक्षाचालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कायदा व सुव्यवस्थेचा बट्टयाबोळ करणारे रिक्षाचालकही आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यांच्याविरोधातही पोलिस लवकरच मोहीम हाती घेणार असल्याचे बोलले जाते. अनेक रिक्षाचालकांचे परमीट संपलेले आहेत. ड्रेसकोड तर कुणीच वापरत नाही. अनेक जण गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. बाहेरगावाहून येणार्‍या अनेक प्रवाशांना रात्रीच्या वेळी अव्वाच्या सव्वा भाडे घेऊन लूट करतात. प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमांना पूर्णपणे हरताळ फासला आहे.

रविवार कारंजा येथे महिलेला मारहाण
रविवार कारंजा येथे रिक्षाचा कट लागल्याने दुचाकीवरील महिला खाली पडली. याचा जाब विचारण्यासाठी संबंधित महिला रिक्षाचालकाकडे गेली असता, रिक्षाचालकाने महिलेलाच मारहाण केल्याचा प्रकार घडला. याबाबतचा व्हिडीओ काल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणार्‍या या रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे नाशिककर कमालीचे त्रस्त झाले आहेत. थेट महिलेवर हात उगारण्याइतपत त्यांची मजल गेली आहे.

रविवार कारंजावर वाहतुकीचा बट्ट्याबोळ

रविवार कारंजावर दिवाळीमुळे सध्या मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली असली, तरी रिक्षाचालक भररस्त्यातच रिक्षा उभ्या करत असल्याने येथे वाहतुकीचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. अशोक स्तंभाकडून आल्यानंतर रेडक्रॉसकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे वाहनधारकांना अशोक स्तंभाकडून रेडक्रॉसकडे वाहन वळविणेही अवघड झाले आहे. यशवंत मंडई पाडल्यानंतर याठिकाणी दुकाने सध्या थाटण्यात आलेली आहेत. येथे येणार्‍या ग्राहकांची वाहने भररस्त्यात उभी केली जातात. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यातच रविवार कारंजा ते रेडक्रॉस सिग्नल हा रस्ता एकेरी असला, तरी दोन्ही बाजूंनी वाहने जा-ये करीत आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीच्या कोंडीवर होतो. कर्णकर्कश्श हॉर्न वाजवून वाहनधारक भंडावून सोडतात. याठिकाणी वाहतूक पोलिस कधीच नसतो. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे मोठी डोकेदुखी ठरत आहे. पोलिस आयुक्तांनी शहरातील गुन्हेगारांना जसे वठणीवर आणले तद्वतच रिक्षाचालकांची मुजोरीही मोडीत काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नाशिककर करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *