इगतपुरी : प्रतिनिधी
गणेश विसर्जनाच्या दिवसापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील तीनलकडी पुलावर पडलेले खड्डे न बुजवल्यामुळे सायंकाळी सहा वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीप्रसंगी कोणत्याही प्रकारे गणेशमूर्तींना नुकसान होऊ नये व धार्मिक, सामाजिक बाधा निर्माण होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली अखेर पोलिसांनीच हातात टिकाव, फावडे घेऊन खड्डे बुजवले.
सतत कोसळणार्या पावसामुळे शहरातील तीनलकडी पूल व विपश्यना विद्यापीठाकडे जाणार्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने त्यात शालेय विद्यार्थी व वयोवृद्ध, तसेच महिला पडत. अनेक लहान-मोठे अपघात होत असल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही खड्डे बुजविले गेले नाहीत. सण-उत्सव काळात या खड्ड्यांतून मिरवणुका जाणार असल्याचेही गांभीर्य सार्वजनिक बांधकाम विभागाला जाणवले नाही. पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीत गणेश मिरवणुकीच्या मार्गांवरील सर्व खड्डे बुजवण्यात येतील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दिली होती. मात्र, शेवटपर्यंत खड्डेच न बुजवल्याने पोलिसांना खड्डे बुजविण्याची वेळ आली. तीनलकडी पूल ते हनुमान मंदिर, धम्मगिरी, ग्रामीण दवाखान्याच्या मार्गापर्यंत झालेले खड्डे बुजवून पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव व पोलीस पथकाने भरपावसात परिश्रम घेत सामाजिक बांधिलकी जोपासत अखेर खड्डेमुक्त रस्ता मोकळा करून दिला. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर तातडे, हवालदार विनोद गोसावी, दीपक निकुंभ, नीलेश देवराज, अभिजित पोटिंदे, करण ठाकूर, कृष्ण गोडसे, दीपक पटेकर, होमगार्ड सुरेश पंडित, दोंदे, मोंडे, भंडागे यांनी खड्डे बुजविण्याचे काम केले. दरम्यान, यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी शांतता
कमिटीत दिलेले आश्वासन फोल ठरले आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.