नाशिक

राज्याच्या विकासाचा समृद्धी महामार्ग

समृद्धी महामार्गाचे विविध टप्प्यांत लोकार्पण

नाशिक : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गाच्या विविध टप्प्यांचे लोकार्पण विविध नेत्यांच्या हस्ते झाले आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची मूळ संकल्पना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची असल्याचे सांगितले जाते. या मार्गाबाबत 1995 पासून चर्चा सुरू होती. मात्र, फडणवीस यांनी 7 सप्टेंबर 2016 रोजी समृद्धी महामार्गाची अधिसूचना काढली होती. उद्धव ठाकरे सरकारच्या काळातही समृद्धी महामार्गाकडे महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पाहण्यात येत होते.
गेल्या 2 मे 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार होते. मात्र, कमानीचा भाग कोसळल्याने तो सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर जुलै 2022 मध्ये राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या 520 किलोमीटर टप्प्याचे लोकार्पण 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर शिर्डी ते भरवीर या 80 किलोमीटर टप्प्याचे लोकार्पण 26 मे 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर भरवीर ते पिंप्री सद्रोद्दिन हा 25 किलोमीटर रस्ता मार्च 2024 मध्ये एमएसआरडीसीने सुरू केला. आता समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर रस्त्याचे लोकार्पण 5 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण 5 जून रोजी होणार आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्ग मुंबई-नागपूर पूर्णपणे सुरू झाला आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर असा असणारा समृद्धी महामार्ग 701 किलोमीटरचा आहे. पाच टप्प्यांत समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले आहे. या महामार्गामुळे मुंबई-नागपूर अंतर आठ तासांनी कमी झाले आहे. याआधी या प्रवासासाठी 16 ते 18 तास लागत होते.
एकूण 120 मीटर रुंदीचा सहापदरी समृद्धी महामार्ग हा नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावापासून ते ठाणे जिल्ह्यातील आमणे गावापर्यंत आहे. या महामार्गावर प्रस्तावित वाहन वेग ताशी 150 किलोमीटर आहे. महामार्गालगत 19 कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती करण्यात येणार होती. त्यातील काही केंद्रांची निर्मिती झाली आहे, तर काहींच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. भारतातील सर्वार्ंत मोठ्या ग्रीनफील्ड असलेल्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूने सुमारे 11 लाख 31 हजार रोपांंची लागवड करण्यात येणार आहे.
नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग दहा जिल्ह्यांना जोडणार आहे. 701 किलोमीटरच्या महामार्गामुळे 26 तालुके जोडले जाणार आहेत. ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्यांमधून तो जातो.

                नाशिक : अश्विनी पांडे

समृद्धी महामार्गाचे चार टप्प्यांत लोकार्पण
शिवमडका ते कोकमठाण (शिर्डी) :                   520 किलोमीटर डिसेंबर 2022
चांदेकसारे (शिर्डी) ते भरवीर खुर्द (सिन्नर) :    80 किलोमीटर मे 2023
भरवीर खुर्द ते पिंप्री सद्रोद्दिन (इगतपुरी)ः       25 किलोमीटर मार्च 2024
पिंप्री सद्रोद्दिन ते आमणे (भिवंडी)ः                76 किलोमीटर, जून 2025
                    एकूण 701 किलोमीटर : अडीच वर्षांचा कालावधी

 

टोलचा दर असा
चारचाकी वाहने (कार, जीप, व्हॅन)     –  1,440 रुपये
हलकी, व्यावसायिक, मिनी बस         – 2,075 रुपये
बस किंवा ट्रकसाठी                            – 3,655 रुपये
अति अवजड वाहनांसाठी                   – 6,980 रुपये

महामार्गावर इतके पूल, उड्डाणपूल

समृद्धी महामार्गाच्या प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि विनामूल्य दूरध्वनी सेवा असेल. समृद्धी महामार्गात अत्याधुनिक वाहतुकीचे जाळे निर्माण करून विविध संरचनेचा समावेश करण्यात आला आहे. यात 65 उड्डाणपूल, 33 मोठे पूल, 274 छोटे पूल, 8 रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल, 25 इंटरचेंजेस, सहा बोगदे, 189 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 110 भुयारी मार्ग, पाळीव प्राणी आणि पादचार्‍यांसाठी 209 भुयारी मार्ग, वन्यजीवांसाठी तीन भुयारी मार्ग आणि तीन उन्नत मार्गांचा समावेश असेल. समृद्धी महामार्गावर बोगद्यात विद्युत रोषणाई, पूल सुशोभीकरण, सुधारित पथदिवे व डिजिटल संकेतांंचा वापर करण्यात
येणार आहे.

समृद्धी महामार्गाला 31 टोलनाक्यांचा ‘ब्रेक’

मुंबई-नागपूर महामार्गावर 31 टोलनाके आहेत. नागपूर-शिर्डी या टप्प्यात 18 टोलनाके कार्यरत आहेत. वायफळ, सेलडोह, वडगाव बक्षी, येळकेली, विरूल, धामणगाव, गावनेर तळेगाव, कारंजा लाड, शेलू बाजार, मेहकर, दुसरं बीड, सिंदखेडराजा, निधोणा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, घायगाव-जांबरगाव, कोकमठाण या ठिकाणी महामार्गावर टोलनाके आहेत. मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गावर 1 एप्रिल 2025 पासून टोलदरात 19 टक्के वाढ लागू केली आहे. हे दर 31 मार्च 2028 पर्यंत कायम राहतील.

पर्यटनस्थळांना जोडणारा महामार्ग

समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारा आहे. या महामार्गामुळे अभयारण्ये, ऐतिहासिक पर्यटनस्थळे, व्याघ्र प्रकल्प सफारी, संग्रहालये, प्रेक्षणीय स्थळे अशा प्रमुख पर्यटनस्थळी जाणे पर्यटकांना सहज शक्य होणार आहे. समृद्धी महामार्ग आणि त्यासाठी 24 ठिकाणी बांधण्यात येणार असलेले जोडरस्ते यामुळे राज्यातील अनेक पर्यटनस्थळे परस्परांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. लोणारचे सरोवर, वेरूळ-अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बिबी का मकबरा आदी पर्यटनस्थळे जवळ येणार आहेत.

 

Gavkari Admin

Recent Posts

राफेल विमाने आता भारत स्वत: बनवणार

मुंबई : भारत आता राफेल लढाऊ विमानांचे फ्युझलाज तयार करणारा पहिला फ्रान्सबाहेरील देश ठरणार आहे.…

11 hours ago

राज्याच्या आर्थिक मजबुतीचा कणा म्हणजे समृद्धी महामार्ग

मुख्यमंत्री : अंतिम टप्प्याचे लोकार्पण इगतपुरी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हिंदुहृदयसम्राट (स्व.) बाळासाहेब ठाकरे…

11 hours ago

जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा आयशर उलटला

मातेरवाडी जऊळके रस्त्यावर वऱ्हाडाचा  आयशर उलटला आठ ते नऊ ग्रामस्थ जखमी दिंडोरी : प्रतिनिधी दिंडोरी…

11 hours ago

कारच्या भीषण अपघातात सहा ठार

एकजण जखमी : चालकाचा ताबा सुटून कार घरावर आदळली कळवण : प्रतिनिधी तालुक्यातील मानूर शिवारात…

11 hours ago

‘भरोसा’ ठेवा, निश्चित तोडगा निघेल!

पाच महिन्यांत 22 महिलांचा संसार फुलला; वादाचे 341 अर्ज प्राप्त नाशिक शहरातील महिला सुरक्षा शाखेतील…

12 hours ago

नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना तिकिटे नाहीत

ना.बावनकुळे : भाजपा उत्तर महाराष्ट्र मेळावा नाशिक : प्रतिनिधी केवळ नेत्यांच्या मागे फिरणार्‍यांना महापालिका निवडणुकीत…

12 hours ago