केंद्र मंत्रिमंडळाकडून मंजुरी
नाशिक : प्रतिनिधी
केंद्र मंत्रिमंडळाने कसारा-मनमाड रेल्वेमार्गावर तिसरी व चौथी लाइन टाकण्यास मंजुरी दिली आहे. 131 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी सुमारे 10,154 कोटींची तरतूद करण्यात आली असून, मुंबई-हावडा उच्च घनता रेल्वेमार्गाची वहनक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
हा प्रकल्प कसारा ते मनमाडदरम्यान राबवण्यात येणार असून, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना थेट लाभ होणार आहे. मार्गाच्या चौपदरीकरणामुळे प्रवासी गाड्यांची संख्या वाढेल. वेळेची बचत होईल तसेच मालवाहतुकीत सुमारे 46.1 एमटीपीए इतकी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होईल.
या प्रकल्पामुळे धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना उत्तम रेल्वे जोडणी मिळणार आहे. यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, भावली धरण आणि श्री घाटनदेवी माता मंदिर यांचा समावेश आहे.
आर्थिक व पर्यावरणीय दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. सुधारित लॉजिस्टिक्समुळे दरवर्षी सुमारे 1,207 कोटींची बचत अपेक्षित असून, 54 कोटी किलो कार्बन उत्सर्जनात घट होणार आहे. ही घट साधारणपणे 2.2 कोटी झाडे लावल्याइतकी असल्याचे
मानले जाते.
एकूणच, कसारा-मनमाड चौपदरीकरण प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या उत्तर-दक्षिण रेल्वे दळणवळणाला नवी गती मिळणार असून, प्रवासी, उद्योग, व्यापार आणि पर्यावरण सर्वच घटकांना दीर्घकालीन लाभ होणार आहे.
The third and fourth railway lines will be built from Kasara to Manmad.