मतदार याद्यांतील गोंधळाची परंपरा कायम

दुसर्‍या प्रभागात नाव गेल्याने मतदारांचे हाल; नावे शोधताना धावपळ अन् गोंधळ

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेसाठी सहाही विभागांत गुरुवारी (दि.15) सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरुवात झाली. मात्र, नेहमीप्रमाणे नाशिक महापालिका निवडणुकीतही मतदार याद्यांतील घोळ पाहावयास मिळाला. परिणामी, मतदारांचे प्रचंड हाल झाल्याचे यावेळी दिसले. विशेषत: मतदार ज्या प्रभागात वास्तव्यास आहेत, त्याऐवजी दुसर्‍याच प्रभागात नाव गेल्याचे चित्र होते. यावरून मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. नावे शोधताना धावपळ, गोंधळ झाल्याचे दिसले.
महत्त्वाची बाब म्हणजे, मतदारयादीतील नावांचा घोळ विधानसभा निवडणुकीतही दिसला होता. त्यातून आयोग काही धडा घेईल अशी अपेक्षा असताना, गुरुवारी मात्र पुन्हा मतदारांना नावे शोधण्यासाठी कसरत करावी लागली. यावर मतदारांनी तीव्र संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. अनेक प्रभागांत मतदारांची नावे अचानक दुसर्‍याच मतदान केंद्रावर आल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. काही मतदारांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रत्येक निवडणुकीत हा गोंधळ का? असा सवाल उपस्थित केला. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीनंतर मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीतही तोच गोंधळ कायम राहिल्याने प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातील विविध भागांत सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसत होती. मात्र, मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर आपले नाव यादीत नसल्याचे समजताच अनेक मतदार गोंधळून गेले. काही मतदारांची नावे शेजारील प्रभागात, तर काहींची अगदी दूरच्या मतदान केंद्रांवर असल्याचे समोर आले. परिणामी, ज्येष्ठ नागरिक, महिला, तसेच दिव्यांग मतदारांना दुसर्‍या ठिकाणी जाऊन मतदान करण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. काही मतदारांनी निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या ऑनलाइन यादीत नाव असल्याचे दाखवूनही प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील छापील यादीत नाव नसल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे मतदान अधिकारी व मतदार यांच्यात अनेक ठिकाणी वादावादी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले.

स्थलांतरित नागरिकांची नावे जुन्याच पत्त्यावर

मतदार याद्यांमधील त्रुटींमुळे अनेक नागरिक मतदान न करता परतल्याच्या घटना घडल्याचे समोर आले. विशेषत: काही भागांत नव्याने स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावे जुन्याच पत्त्यावर असल्याने नव्या ठिकाणी नाव नोंदवूनही मतदारयाद्यांत ते आले नाही. यामुळे मतदानाची इच्छा असूनही तांत्रिक अडचणीमुळे अनेकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले.

आम्ही प्रभाग क्रमांक 17 मध्ये वास्तव्यास असून, माझ्या घरातील तीन सदस्यांची नावे ही शेजारच्या प्रभागात गेली. यामुळे नावे शोधताना व मतदान केंद्र शोधताना मोठी धावपळ झाली. धक्कादायक म्हणजे, ज्या प्रभागात वास्तव्य आहे तिथल्याच मतदारयादीत नाव असणे अपेक्षित असताना तसे झाले नाही.
– ऋषीकेश कदम, रहिवासी, प्रभाग 17

The tradition of confusion in voter lists continues

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *