जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण
श्रीनगर :
काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल (दि.6 जून) कटरा स्टेशनवरून धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कटरा येथे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
जगातील सर्वांत उंच रेल्वे आर्च ब्रिजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिरंगा फडकावत आनंद व्यक्त केला. चिनाब ब्रिज आणि देशातील पहिला केबल-स्टेड रेल्वे ब्रिज अंजी ब्रिजला मोदींनी भेट दिली. यावेळी या ब्रिजचे लोकार्पण करण्यात आले.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते 46 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इतर विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही यावेळी करण्यात आले. उत्तर रेल्वेच्या कटरा-श्रीनगर मार्गावर 7 जूनपासून वंदे भारत ट्रेन सेवा सुरू करण्यात येणार असून आयआरसीटीसी वेबसाइटवर तिकीट बुकिंग करता येईल. कटरा आणि श्रीनगर दरम्यान आठवड्यातून सहा दिवस दोन गाड्या धावतील. स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतरही हिमवर्षावाच्या काळात काश्मीर खोरे देशाच्या इतर भागांपासून तुटलेले असते. हिमवर्षावाच्या वेळी राष्ट्रीय महामार्ग-44 बंद असल्याने काश्मीर खोर्‍यातील प्रवेश देखील बंद असतो. बर्फवृष्टी होत असताना जम्मू ते काश्मीर रस्त्याने प्रवास करण्यासाठी 8 ते 10 तास लागायचे. पण, आता वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर, हा प्रवास केवळ तीन तासांत पूर्ण होईल. कटरा-श्रीनगर ट्रेन ही वर्षभर काश्मीरला रेल्वेने जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे. पुढील टप्प्यात, नवी दिल्लीहून श्रीनगरमार्गे जम्मूपर्यंत वंदे भारतसह इतर गाड्या चालवण्याची योजना आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *