नाशिक : प्रतिनिधी
मुंबई, ठाणे, नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. मात्र राज्यातील या घटना बाह्य सरकारची निवडणुका घेण्याची मानसिकता नाही. त्यांच्या मनामध्ये पराभवाची भीती असल्याचे अंधेरीच्या पोटनिवडणुकीने दाखवून दिल्याची टीका ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. तसेच फ्रॅक्चड फ्रीडम या पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी जाहीर झालेला पुरस्कार रद्द करणे हे लोकशाहीला घातक असल्याची टीकाही त्यांनी केली.
नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत खा. राऊत बोलत होते. पुढे ते म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून बोलणे हा लोकशाहीचा प्राण आहे. जे पटत नाही, त्याचा विरोध करणे महत्त्वाचा आहे. जो तुम्ही पुरस्कार दिलेला आहे तो विचारपूर्वकच दिलेला आहे. मात्र दिलेला पुरस्कार तुम्ही अचानक घाई गडबडीने रद्द करणे हे चुकीचे आहे. शासनाच्या या कृतीमुळे लोकांचे पुस्तक वाचायचे थांबणार नाही. किंबहुना प्रचार जास्त होईल. पुरस्कार रद्द झाल्याने एक मोठा वर्ग नाराज झाला असून, हा निर्णय शहाणपणाचा नसल्याची टीकाही राऊत यांनी केली.
सुषमा अंधारे यांच्या जुन्या व्हिडिओबाबत वारकरी संप्रदायाचे नेते बोलत आहेत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर ते का बोलले नाहीत. तसेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे सातत्याने वारकरी संंप्रदायाबरोबर राहिले आहे. त्यांचे प्रश्न, त्यांच्या भूमिका, शिवसेनेच्या नेत्यांनी वारकरी संप्रदायाचा अवमान कधीही केलेला नाही. आणि करणार नाही. आमच्या स्वप्नातही तसे येणार नाही. मात्र गेल्या काही वर्षापासून सातत्याने जे लोक व पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर नाही, म्हणजे ते हिंदुत्ववादी नाही अशा पद्धतीने आमच्यावर,आमच्या लोकांवर किंवा कॉंग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांच्यावर टीका केली जात आहे. या सर्वांना एकप्रकारे टार्गेट केले जात आहे. आमचे या संदर्भात वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांशी चर्चा सुरू आहे. याबाबत सुषमा अंधारे यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. वारकरी संप्रदाय आमचे सर्व दैवत असून, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज,विठोबा माऊली असते यांच्याविषयी आमच्या मनात नितांत श्रद्धा आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलणार्या राज्यपालांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी, प्रसाद लाड, पर्यटन मंत्री मंगलप्रभाग लोढा आदींवर भाजपने कारवाई का केली नाही. याविरोधात (दि.17) रोजी राज्यात विराट मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा कधीही झालेला नसेल असा होणार असल्याचा दावा राऊत त्यांनी केला.
तेव्हा तुमच्या तोंडाला कुलूप का?
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांपासून इतर महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने केली जात असताना या राज्यकर्त्यांच्या तोंडाला कुलूप का लागले आहे. यावर कारवाई करण्याचे सोडून तुम्ही नागपूरमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. बच्चू कडू कोणावरही टीका करू शकतात. उद्या आमचे सरकार आले तर ते आमच्या पुढे असतील, असे अनेक लोक आहेत. ते असे पुढे पुढे जायचे काम करतात. सरकार बदललं की आपली माणसं आणण्याचे प्रयोग सुरू असतात. महाप्रबोधन यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. त्याचा राग येणे काही लोकांना साहजिकच आहे. काही वर्षांपूर्वी मेहबुबा मुफ्ती यांच्याविषयी भाजप गरळ ओकत होते, मात्र भाजपने मेहबुबा मुफ्तीबरोबर काश्मीरमध्ये सत्ता स्थापन केली. मग आम्ही त्यांचे व्हिडिओ काढायचे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. 17 डिसेंबर रोजी निघणार्या मोर्चात अजित पवार, उद्धव ठाकरे नाना पटोले आदी सर्वच नेेते असणार आहेत.
तर मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार
महाराष्ट्र, कर्नाटक सीमावादप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेणार आहे. या प्रश्नी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावर्ती भाग आहे. तो केंद्रशासीत करावा, आणि बेळगांवातून जे कन्नडी पोलीस आहेत. त्यांना काढून त्यांच्या जागी केंद्राच्या जवानांची नियुक्ती करावी. Aु गृहमंत्र्यांना याबाबतचे अधिकार आहेत. ते तसे करु शकतात. जर असे झाले तर आपण मुख्यमंत्र्यासह गृहमंत्र्यांचे देखील स्वागत करु असे खा. राऊत त्यांनी म्हटले.