आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हरवल्यानंतर ती अंबड पोलिसांनी परत केल्याने संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे. या घटनेत केवळ पोलिसांची तत्परता नाही तर एका सजग आणि प्रामाणिक नागरिकाचे योगदानही महत्त्वाचे ठरले.अंबड पोलीस ठाणे हद्दीत घडलेली कौतुकास्पद घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी सकाळच्या दरम्यान विशाल जाधव हे आपल्या कुटुंबासह पवन नगरजवळील शिंदे मेस नजीक असलेल्या एका फळ विक्रेत्याकडे फळे खरेदीसाठी गेले होते. फळांची खरेदी करून ते घाईघाईने निघून गेले.
मात्र, त्यांनी बहिणीच्या लग्नासाठी जमवलेली रोख रक्कम, औषधे आणि काही महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग विशाल जाधव तिथेच विसरली. याच वेळेला खाजगी इलेक्ट्रिकलचे कामे करणारे वायरमन सुरेश कचवे या ठिकाणाहून जात असताना कचवे यांना ती बॅग दिसली. त्यांनी बॅग उचलून तपासली असता त्यात मोठी रोख रक्कम आणि महत्वाचे दस्तऐवज असल्याचे लक्षात आले. आपल्या प्रामाणिक वृत्तीचे उदाहरण देत त्यांनी कोणत्याही लालसेला बळी न पडता तात्काळ अंबड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील अनिल गाढवे, राकेश पाटील, किरण गायकवाड आणि तुषार मते आदी पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बॅग आपल्या ताब्यात घेतली आणि दोन्ही संबंधित व्यक्तींना म्हणजे विशाल जाधव व सुरेश कचवे यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या हस्ते बॅगमधील संपूर्ण 1 लाख 75 हजार रुपये रोख रक्कम, औषधे आणि कागदपत्रे विशाल जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. बॅग परत मिळाल्याने जाधव कुटुंब भावूक झाले व पोलिसांचे तसेच सुरेश कचवे यांचे आभार मानले.यावेळी वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांच्या वतीने प्रामाणिक नागरिक सुरेश कचवे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे एक कुटुंब संकटातून वाचले.ही संपूर्ण घटना अंबड पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि समाजात अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचे जिवंत उदाहरण ठरली आहे.