मराठवाडा दौर्यात नुकसानीची पाहणी
मुंबई :
जूनची कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यत सरकारला मत नाही हे बोर्ड लावा, निश्चय करून टाका आणि सगळीकडे बोर्ड लावा, हे सरकार दगाबाज आहे. पॅकेजला खेकड्याने भोकं पाडली का? अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
धाराशिव येथे शेतकर्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही शेतकरी आहात ना? नाहीतर सरकारचे लोक म्हणतील मुंबईतून लोकं आणली आणि टोप्या घालून बसवली. मला सभा घ्यायची नाहीय, मी तुमच्याशी बोलायला आलोय. मुख्यमंत्री म्हणाले इतिहासतली सगळ्यात मोठी मदत आहे, पण ही इतिहासातील सगळ्यात मोठी थाप आहे. तुमच्या पॅकेजला खेकड्याने भोकं पाडली का? पॅकेजचं काय झालं? मदत का मिळाली नाही? अशी टीका उद्धव ठाकरेंनी धाराशिव दौर्यातून सरकारवर केली. हे सरकार दगाबाज सरकार आहे, या सरकारशी दगाबाजी केली पाहिजे. निवडणूक आली म्हणून मी आलोय म्हणताय, अरे आपत्ती आलीये ती थोडीच थांबली? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
विमा कंपन्याना सांगतो की, शेतकर्यांची सगळी रक्कम द्या, नाहीतर हे सगळे तुमच्या ऑफिसवर येतील. फसल योजनेमध्ये तुम्हाला फसवलं आहे, फसलमध्ये फसवलं आहे.
उद्धव ठाकरेंकडून शेतमालाची पाहणी
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी धाराशिवमधील काही गावांमध्ये जाऊन शेतमालाची पाहणी केली. यावेळी पाथरूडमधील एका आजींनी शिदोरी दिली. यावेळी भाषण करताना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, काही जण म्हणतात निवडणुका आहेत म्हणून दौरा सुरू आहे. पण मला एवढं सांगायचं आहे की, जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्याचवेळी त्यांनी शेतकर्यांसाठी निर्णय घेतला. मला शेतकर्यांना विचारायचं आहे, आताच्या दिवाळीला आनंदाचा शिधा मिळाला का? हीच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी साहेब इथे आले आहेत.
टोमणे मारण्यापलीकडे ठाकरे काहीही करू शकत नाहीत मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला
कोल्हापूर ः
उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नाहीत. पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, याचा आनंद असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना लगावला. निवडणुका पुढे कशा ढकलल्या जातील हेच विरोधकांना हवंय.
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदा निवडणुकांची घोषणा केली, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत टीका केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणुका पुढे कशा ढकलल्या जातील हेच विरोधकांना हेच हवंय. निवडणुका घोषित झाल्यात, आम्ही पक्ष म्हणून निवडणुकांना सामोरे जाऊ. त्या त्या स्तरावर निर्णय घेतले जातील. या निवडणुकीत राज्यातील जनता आमच्या महायुतीलाच कौल देईल.त्यांच्या भाषणात एकतरी विकासाचा मुद्दा दाखवा आणि हजार रुपये मिळवा, अशी ठाकरेंची स्थिती आहे. विरोधी पक्षाला ही निवडणूक पुढे ढकलायची आहे. निवडणूक मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने घ्यावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.