निसर्गाच्या लहरीपणासह बियाणे, रासायनिक खतांच्या किमतीत वाढ
लासलगाव ः वार्ताहर
निसर्गाचा लहरीपणा, बी-बियाणे, रासायनिक खते तयार करणार्या कंपन्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत खतांच्या किमतीत 250 ते 300 रुपयांनी दरवाढ केल्याने शेतकर्यांना या महागाईचा फटका बसणार आहे. परिणामी, यंदाचा खरीप हंगाम शेतकर्यांचे आर्थिक बजेट कोलमडविणार असल्याचे चित्र दिसत आहे.
शेतकरी हा कुठल्याही पिकांचे उत्पादन घेण्यासाठी पैशांची तजबीज करत असतो. पेरणीसाठी त्याला बँकेकडून कर्ज घ्यावे लागते, तसेच खासगी सावकारांकडून आणि हात उसनवारीनेे पैसे घेत खरीप हंगामाला सुरुवात करीत असतो. अगदी बियाणे खरेदीपासून ते पिकांची उगवण झाल्यानंतर त्यांना रासायनिक खते व कीडनाशक औषधांची फवारणी करून शेतकरी पिकांना वाढवत असतो.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय, मुख्यत्वे शासनाच्या चुकीच्या कृषी धोरणांमुळे शेतमालाला पाहिजे तसा अपेक्षित भावदेखील मिळत नाही. यामुळे शेतकर्यांचे वर्षाचे आर्थिक गणित कोलमडून जाते. अशातच आता सर्व बी-बियाणे आणि रासायनिक खत कंपन्यांनी प्रतिगोणी 250 रुपयांनी भाववाढ केल्याने शेतकर्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
खरीप हंगामात प्रामुख्याने मका, सोयाबीन, बाजरी, मूग, कापूस, उडीद, तूर यांसारख्या पिकांची पेरणी केली जाते. यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्व बियाणे बाजारपेठेत दाखल झाले असून, काही कंपन्यांचे मका बियाणे हे 150 ते 200 रुपयांनी महागले आहे. मकाचे चार किलोचे बियाणे पाकीट 2250 रुपयांपर्यंत घ्यावे लागत आहे, तसेच रासायनिक खतांच्या किमतीतही 300 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशक औषधे खरेदी करताना शेतकर्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहे.
फडणवीस सरकार म्हणते, आम्हीच खरे शेतकर्यांचे कैवारी आहोत, तर दुसरीकडे विरोधक पण म्हणतात, आम्हीच खरे शेतकर्यांचे कैवारी आहोत. मात्र, अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकर्यांचा जीव चाललाय, यांनी फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत राहायचं का? वा रे वा अजब तुमचे सरकार..
– सुनील गवळी, ब्राह्मणगाव-विंचूर