त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकनगरी टाळ-मृदंग आणि हरिनामाचा जयघोषांनी दुमदुमली आहे. सर्वत्र निवृत्तिराया निवृत्तिराया असा नामजप कानी पडत आहे. भगव्या पताका आणि रथ यांचा अखंड प्रवाह वाहतो आहे. साधारणतः महिना-पंधरा दिवसांपासून चालत असलेल्या पावलांना येथे विश्रांती मिळाली आहे. त्र्यंबकनगरीच्या वेशीवर येताच ब्रह्मगिरीचे पर्वतशिखर नजरेस पडताच वारकरी गहिवरतो. पायी प्रवासाचा शीण विसरून नाथांच्या संजीवन समाधीवर माथा टेकवून कृतार्थ होण्यासाठी आतुर होऊन अधिक वेगाने पुढे सरकतो. सोमवारी (दि. 12) सकाळपासून सुरू असलेला दिंड्यांचा ओघ मंगळवारी (दि. 13) सायंकाळपर्यंत सुरू होता.
श्री त्र्यंबकराजाच्या मंदिरात उत्तर दरवाजाने दिंडीतील वारकर्यांना प्रवेश देण्यात येत आहे. वारकरी प्रांगणात भजन करत अभंगसेवा रुजू करतात. फुगड्या घालतात आणि पश्चिम दरवाजाने बाहेर पडत थेट कुशावर्तावर जातात. तेथून कृष्ण मंदिराच्या बाजूने संत निवृत्तिनाथ मंदिरात दिंड्या पोहोचत आहेत.
संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिरात आलेल्या दिंडीला मुखदर्शनाची व्यवस्था विश्वस्त मंडळाने केली आहे. दर्शनबारी अहोरात्र सुरू आहे. येथे आलेल्या दिंडीतील विणेकरी भाविकांचा सन्मान करण्यात येत आहे. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड. सोमनाथ घोटेकर व सहकारी येथे आलेल्या दिंडीचालकांचा सत्कार करतात. मंगळवारी रात्री 11 ला संस्थानची महापूजा आणि बुधवारी पहाटे शासकीय महापूजा होत आहे. शासकीय महापूजेसाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे व आमदार हिरामण खोसकर यांची उपस्थिती राहील.
यंदा मंगळवारी सायंकाळपर्यंत सहाशेच्या आसपास दिंड्या आल्या आहेत. शहरात व शहराच्या आजूबाजूला दिंड्यांसाठी जागा शिल्लक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दिंड्या व वाहनांनी आलेल्या भक्तांना थांबण्यास जागा शिल्लक राहिलेली नाही. अद्याप काही भक्त बैलगाड्यांनी येत आहेत. शासनाने यापुढच्या काळात यात्रा भरविण्यासाठी जागा राखीव ठेवणे आवश्यक ठरले आहे.
Trimbaknagari resounds with the chants of Hari Nama.